IPL 2026: प्लेऑफमधील जागा पक्की केल्यानंतरही RRचा कर्णधार नाराज, उणीवा दाखवत रियान पराग म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत चौथ्या स्थानावर मोहोर उमटवली. पण या कामगिरीनंतरही राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग नाराज आहे. त्याने सामन्यानंतर उणीवा अधोरेखित केल्या.

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने चांगली सुरूवात केली होती. पण मधल्या काही सामन्यात पराभव झाल्याने स्पर्धेतील स्थान डळमळीत झालं होतं. पण शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि प्लेऑफच्या चौथ्या जागेवर पकड मिळवली. राजस्थान रॉयल्सने साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 205 धावांचं आव्हान ठेवलं. पण मुंबई इंडियन्स संघ फक्त 175 धावा करू शकला. हा सामना राजस्थान रॉयल्सने 30 धावांनी जिंकला आणि प्लेऑफचं तिकीट मिळवलं. राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये जागा पक्की करूनही कर्णधार रियान परागने नाराजी व्यक्त केली आहे. प्लेऑफच्या सामन्यांपूर्वी संघाने काय चुका केल्या याचा पाढा वाचला आणि त्यात दुरूस्ती करणं गरजेचं असल्याचं म्हणणं मांडलं.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने सांगितलं की, ‘जेव्हा गोष्टी योजनेनुसार घडतात तेव्हा छान वाटतं. मला माहीत आहे की आम्ही सामना जिंकलो, पात्र ठरलो, पण अशा काही गोष्टी आहेत ज्यात आम्ही सुधारणा करू शकतो. स्थिरावलेल्या फलंदाजांनी आणखी थोडा वेळ खेळावं अशी माझी इच्छा होती.’ जोफ्राला सातव्या आणि जडेजाला नवव्या क्रमांकावर खेळवण्याबद्दल रियान पराग म्हणाला की, “आम्हाला धावांची गरज होती. ही अशी खेळपट्टी आहे जिथे मधल्या फळीतील दोन फलंदाजांना चेंडूमागे एका धावेच्या गतीने खेळवता येत नाही. एका फलंदाजाने धोका पत्करावा आणि दुसऱ्याने थोडा वेळ खेळपट्टीवर टिकून राहावे, अशी माझी इच्छा होती. जडेजा नेहमीप्रमाणेच विश्वासार्ह आहे. मला माहित होते की तो शेवटच्या षटकांमध्ये 10 चेंडूंमध्ये किमान 20 धावा करून देईल, आणि त्याने ते करून दाखवले. ”
रियान पराग पुढे म्हणाला की, खरं तर या हंगामात मी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. मला अशाच प्रकारे नेतृत्व करायला आवडतं. मी आसामचंही असंच नेतृत्व करतो. तुम्हाला संधी साधायलाच हवी, हा जुगार नाही. अर्थातच तुम्ही याचा खूप विचार करता. मला वाटलं, हार्दिकला बाद करणारा फक्त एकच खेळाडू आहे आणि तो म्हणजे जोफ्रा. त्याचा चांगला फायदा झाला. निर्णय घेताना नेहमीच अंतर्ज्ञान महत्त्वाचे ठरते .