
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सचिनसोबत पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, मुलगी सारा आणि अर्जुनची होणारी बायको सानियाही सोबत होती. यावेळी सचिनने अर्जुनच्या लग्नाचे आमंत्रण पंतप्रधानांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे. अर्जुन आणि सानियाच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता या लग्नाच्या तयारीला वेग आल्याचे समोर आले आहे.
सचिनने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबत त्याच्या कुटुंबासह झालेल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. सचिनने लिहिले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्जुन आणि सानियाच्या लग्न समारंभाला आमंत्रित करण्याचा आम्हाला आनंद झाला. या तरुण जोडप्याला आशीर्वाद आणि सल्ला दिल्याबद्दल मोदीजींचे आभार.”
We were honoured to invite Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji to Arjun and Saaniya’s wedding. Thank you, Modi ji, for your blessings and thoughtful advice for the young couple. pic.twitter.com/7oxOZm3i5X
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 10, 2026
सचिनने यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्याने त्याची पत्नी अंजलीसोबत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. सचिनने सोनिया गांधी यांनाही अर्जुनच्या लग्नाचे आमंत्रण दिले असल्याचे समोर आले आहे.
सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा सानिया चांडोकशी झाला आहे. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हे हॉस्पिटॅलिटी आणि फूड क्षेत्रात प्रसिद्ध आहे, हे कुटुंब इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी या आईस्क्रीम ब्रँडचे मालक आहेत. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खाजगी समारंभात झाला, ज्यामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे. आगामी आयपीएलमध्ये तो लखनऊकडून खेळताना दिसणार आहे. दरम्यान, अर्जूनच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, अर्जुनने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून त्याचे शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने मुंबई विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे.