एका सामन्यात फेल अन् थेट बाहेरचा रस्ता? संजू सॅमसनच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, दुसऱ्या टी20 पूर्वी चर्चेला उधाण!
संजू सॅमसनच्या चाहत्यांची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. कारण मागच्या पाच सामन्यात संजू सॅमसनने निराशा केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा टी20 सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा रोमांचक सामना 15 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याचा खराब फॉर्म पुन्हा एकदा गंभीर चर्चेचा विषय बनला आहे. सातत्याने संधी मिळूनही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनवर आता संघातून थेट वगळले जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
पहिल्या सामन्यात पुन्हा निराशा आणि शेवटच्या 5 डावांत अवघ्या 43 धावा
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात संजूने दोन सुरेख चौकार मारून डावाची चांगली सुरुवात केली होती. मात्र, मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात तो पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि अवघ्या 8 चेंडूंमध्ये 10 धावा करून तंबूत परतला. संजू सॅमसनची बॅट गेल्या काही सामन्यांपासून पूर्णपणे शांत राहिली आहे. त्याने आपल्या शेवटच्या पाच आंतरराष्ट्रीय टी20 डावांमध्ये केवळ 43 धावा केल्या आहेत. यात त्याच्या शेवटच्या चार डावांची धावसंख्या पाहिली तर ती अनुक्रमे केवळ 27 धावा, 1 धाव, 0 धावा आणि 5 धावा अशी अत्यंत निराशाजनक राहीली आहे.
वैभव सूर्यवंशीचं तगडं आव्हान
संजू सॅमसनच्या या फ्लॉप शोमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे, कारण बेंचवर बसलेला युवा सनसनाटी खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यावरील टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत जेव्हा संजू सॅमसनला विश्रांती देण्यात आली होती, तेव्हा वैभव सूर्यवंशीने त्या संधीचे सोनं केले. वैभवने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत50 पेक्षा जास्त सरासरीने आणि उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 151 धावा कुटल्या होत्या. या शानदार कामगिरीदरम्यान त्याने दोन धडाकेबाज अर्धशतके झळकावली आणि ‘मालिकावीर’ पुरस्कारावरही आपले नाव कोरले होते.
दिल्लीत होणाऱ्या या दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्वतःला सिद्ध करावेच लागेल. जर या सामन्यातही त्याची बॅट शांत राहिली, तर पुढील सामन्यात त्याचा पत्ता कट करून संघ व्यवस्थापन वैभव सूर्यवंशीला थेट संधी देणार हे आता निश्चित मानले जात आहे.