शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज उठवण्यावर…! विद्यार्थी आंदोलनावर कर्णधार गिलने मांडल्या भावना
नीट पेपरफुटीवरून देशभरात विद्यार्थी आंदोलनं करत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या तीव्र भावना व्यक्त करत आहे. असं असताना टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीमुळे देशभरातील तरूण रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. आपल्या भावना या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवत आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व कॉकरोज जनता पार्टी करत असून त्याला देशभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत आमरण उपोषण सुरू केलं होतं. पण काही मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. पण शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांवर कॉकरोज जनता पार्टी ठाम आहे. एकीकडे आंदोलनाची धार आणखी तीव्र होत आहे, तर दुसरीकडे सरकारसोबत चर्चाही केली जात आहे. प्रकरण गाजत असताना देशभरातील विविध स्तरातून या आंदोलनाबाबत भावना व्यक्त होत आहेत. भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत देशातील तरूणांप्रती आपली सहानुभूती व्यक्त केली आहे.
काय म्हणाला भारतीय कर्णधार गिल?
शुबमन गिलने या आंदोलनाप्रती आपल्या भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या संयमाची प्रशंसा केली आहे. शुबमन गिलने आपल्या इंस्टा स्टोरीत लिहिलं की, ‘एक तरुण भारतीय म्हणून, माझा विश्वास आहे की आपल्या पिढीला शिकण्याची, स्वप्न पाहण्याची आणि आपण सर्वजण ज्या भविष्याची आकांक्षा बाळगतो ते घडवण्याची प्रत्येक संधी मिळायला हवी. शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज उठवण्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक तरुणाबद्दल मला खूप आदर आहे.’
🇮🇳 Indian captain Shubman Gill shares a new Instagram story.#ShubmanGill #TeamIndia #IndianCricket #Cricket #India #Trending #Viral #NewsUpdate pic.twitter.com/K2bl0t6RjY
— KUMAR (@MyCric101) July 23, 2026
शिक्षण हे आपल्या देशाचं सामर्थ्य
शुबमन गिलने शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करत संदेशाचा समारोप केला. शुबमन गिल म्हणाला की, ‘शिक्षणामध्ये आपल्या देशाचे भविष्य घडवण्याची शक्ती आहे. मला आशा आहे की आपण करुणा, परस्पर आदर आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे सर्वोत्तम हित लक्षात घेऊन पुढे वाटचाल करू. भारताच्या भविष्यासाठी..’ दरम्यान, शुबमन गिलने आपल्या इन्स्टा स्टोरीत कोणताही राजकीय उल्लेख करणं टाळलं आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर शुबमन गिल सध्या आराम करत आहे. कारण भारत झिम्बाब्वे टी20 मालिकेत संघाचा भाग नाही. आता पुढच्या महिन्यात कसोटी मालिकेसाठी सज्ज होणार आहे.