T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह, आयसीसीच्या निर्णयाकडे लक्ष

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. दोन महिने आयपीएलमध्ये खेळाडूंचा चांगला सराव झाला आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडशी होणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाची टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह, आयसीसीच्या निर्णयाकडे लक्ष
Image Credit source: BCCI
| Updated on: May 15, 2024 | 7:52 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील पहिला सामना 5 जूनला आयर्लंडशी खेळणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया अमेरिकेतील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी एक सराव सामना खेळण्याच्या तयारीत आहे. टीम इंडिया हा सामना न्यूयॉर्कमध्ये खेळू इच्छित आहे. पण हा सराव सामना फ्लोरिडात खेळण्यास सांगितलं जात आहे. एका रिपोर्टनुसार, बीसीसीआय इच्छा आहे की टीम इंडियाने वर्ल्डकपपूर्वी न्यूयॉर्कमध्ये सराव सामना खेळावा. कारण स्पर्धेत भारतीय संघाला चार पैकी 3 सामने न्यूयॉर्कमध्ये खेळायचे आहे. पण आयसीसी आणि वेस्ट इंडिज क्रिकेट टीम इंडियाला फ्लोरीडात सराव सामना खेळण्यास सांगत आहे. टीम इंडियाला न्यूयॉर्कमध्ये सराव सामना खेळण्यास मिळाला तर नक्कीच फायदा होईल. कारण न्यूयॉर्कमध्येच टीम इंडियाला पाकिस्तानसोबत सामना खेळायचा आहे.या सामन्यापूर्वी टीम इंडियाला इथल्या वातावरण आणि स्थितीचा अंदाज येईल. पण आयसीसी याला अजूनही परवानगी देत नाही.

रिपोर्टनुसार, टीम इंडियाला याचा फायदा होईल आणि त्यावरून वाद होऊ शकतो, असं आयसीसीला वाटत आहे. दुसरीकडे, बीसीसीआय या प्रकरणाकडे कसं पाहते हे देखील महत्त्वाचं आहे. टीम इंडियाचा सराव सामना 25 किंवा 26 मेला होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार टीम इंडियाचे काही खेळाडू 21 मे रोजी वर्ल्डकपसाठी रवाना होणार होते. मात्र आता ही तारीख टाळण्यात आहे. आता प्लेऑफमधून बाहेर गेलेल्या संघातील खेळाडू पहिल्या खेपेत रवाना होतील. यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल यांचा समावेश असेल.

टीम इंडिया अ गटात असून या गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहेत. त्यामुळे साखळी फेरीत प्रत्येक संघ चार सामने खेळेल. या गटात टॉपला असलेल्या दोन संघांची वर्णी सुपर 8 फेरीत होईल. या गटातून टॉप चार संघ उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्कं करतील.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान