‘भारतासाठी पुन्हा खेळायला आवडेल, पण…’ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे मोठे वक्तव्य
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सलग दोन आयपीएल स्पर्धेत आपल्या कामगिरीची छाप सोडली. इतकंच काय तर निवडकर्त्यांचं लक्षही वेधून घेतलं आहे. मात्र आता त्याला संधी मिळेल की नाही? हे सांगणं कठीण आहे.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलग दोन हंगाम अत्यंत प्रभावी कामगिरी केल्यानंतर भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा भारतीय संघातील पुनरागमनाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. प्रसिद्ध क्रीडा समालोचक जतीन सप्रू यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना भुवनेश्वरने आपल्या मनातली खंत, संघातून बाहेर पडतानाचा अनुभव आणि पुन्हा खेळण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे. भुवनेश्वर कुमार नोव्हेंबर 2022 पासून भारतीय संघाबाहेर आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत त्याने शेवटचे भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आपल्या पुनरागमनाबाबत बोलताना तो म्हणाला, “मी आता मैदानावर स्वतःला काही सिद्ध करण्यासाठी खेळत नाही, पण हो, मला पुन्हा एकदा भारतासाठी खेळायला नक्कीच आवडेल.”
भुवनेश्वर कुमारने पुढे स्पष्ट केले की, तो आता कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे संघातून पुन्हा वगळले गेले, तरी त्याचा कोणताही मानसिक परिणाम होणार नाही. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भुवनेश्वरला सुरुवातीला वाटले होते की निवड समिती त्याला संघात परत घेऊ शकते. त्या काळात त्याला संघ व्यवस्थापनाकडून एक फोन देखील आला होता. “मला बोलावणं आलं होतं. त्यांनी जे सांगितलं, त्यावरून मला वाटलं की कदाचित पुढच्या दोन मालिकांसाठी माझा विचार केला जाईल. पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे परिस्थिती नव्हती,” असे भुवीने सांगितले. अपेक्षा पूर्ण न झाल्याबद्दल बोलताना भुवी पुढे म्हणाला की, “ते त्रासदायक नव्हतं, कारण तेव्हा काय घडत आहे हे मला माहीत होतं आणि मी ते स्वीकारलं होतं. ते सोपं नव्हतं, पण कुटुंबाने त्यात मोठी भूमिका बजावली.”
2022 च्या त्या पराभवानंतर पत्नीला फोन करून काय म्हणाला होता भुवी?
मुलाखतीदरम्यान भुवनेश्वरने 2022 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत ॲडलेड येथे इंग्लंडकडून उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतरचा एक वैयक्तिक किस्सा शेअर केला. त्या पराभवानंतरच आपली भारतीय विश्वचषक कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, याची त्याला जाणीव झाली होती. भुवी म्हणाला की, “पराभवानंतर मी माझ्या खोलीत आलो आणि थेट माझ्या पत्नीला फोन केला. ड्रेसिंग रूममध्ये सगळेच निराश झाले होते. मी नुपूरला सांगितलं की, भारतासाठी हा माझा शेवटचा विश्वचषक होता असं मला वाटतं. मी हे माझ्या अनुभवावरून सांगितलं होतं. कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारची मोठी स्पर्धा हरता, तेव्हा निवडकर्ते भविष्याचा विचार करून पुढे पाहू इच्छितात आणि ते योग्यच आहे.”
आयपीएलमधील कामगिरीने टीम इंडियाचं दार उघडणार?
भुवनेश्वर कुमारने आयपीएल 2025 च्या हंगामात 17 बळी घेतले होते. त्यानंतर आयपीएल 2026 च्या हंगामात त्याने याहूनही अधिक घातक गोलंदाजी करत अवघ्या 17.89 च्या सरासरीने तब्बल 28 बळी घेतले. इतिहास रचत विक्रमी तिसऱ्यांदा ‘पर्पल कॅप’ जिंकण्यापासून तो अवघ्या एका विकेटने दूर राहिला. मात्र, आयपीएलमधील त्याच्या या स्विंग आणि अचूक माऱ्याच्या जोरावर भारताच्या टी20 संघात पुनरागमनासाठी त्याच्या नावाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.