India A : सलग 2 पराभवांमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, अफगाणिस्तान विरुद्ध शेवटची संधी

India A vs Afghanistan A : टीम इंडियाला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे.

India A : सलग 2 पराभवांमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, अफगाणिस्तान विरुद्ध शेवटची संधी
Vaibhav Sooryavanshi Team India A
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 16, 2026 | 6:40 AM

इंडिया ए टीमचा 15 जून रोजी ट्राय नॅशन ए सीरिजमध्ये सलग दुसरा पराभव झाला. टीम इंडियाला आधी डीएलएसनुसार अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. तर सोमवारी 15 जूनला भारताला श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताने अशाप्रकारे सलग 2 सामने गमावले. त्यामुळे आता टीम इंडियाला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे आता भारताची करो या मरो अशी स्थिती झाली आहे.

विजयी सलामी आणि मग सलग 2 पराभव

टीम इंडियाने यजमान श्रीलंकेला पराभूत करत विजयी सलामी दिली. भारताने तिलक वर्मा याच्या नेतृत्वात 9 जून रोजी श्रीलंकेवर 8 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. भारताने श्रीलंकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावत 2 गुणांची कमाई केली. त्यानंतर भारतासमोर 11 जूनला अफगाणिस्तानचं आव्हान होतं. टीम इंडियाची युवा ब्रिगेड अफगाणिस्तानला सहज गुंडाळेल असा विश्वास चाहत्यांना होता.

अफगाणिस्तान विरुद्ध पावसामुळे गेम!

भारतीय संघाने पावसाने प्रभावित 49 षटकारांच्या या सामन्यात 349 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला 350 धावांचं आव्हान मिळालं. मात्र त्यानंतर पावसाच्या खोड्यामुळे अफगाणिस्तानला सुधारित आव्हान मिळालं. मात्र या दरम्यान मुसळधार पाऊस सुरुच होता. तसेच जेव्हा सामन्याचा निकाल लावण्याचं निश्चित झालं तेव्हा अफगाणिस्तान डीएलएसनुसार पुढे होती. त्यामुळे अफगाणिस्तानचा 4 धावांनी विजय झाला. अशाप्रकारे भारताला पावसामुळे हा सामना गमवावा लागला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव

त्यानंतर भारताने 266 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला 265 धावांवर रोखलं. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. पंचांना केलेल्या विनंतीनंतर कमी सूर्यप्रकाशात सुपर ओव्हरचा थरार रंगला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 17 धावांच्या प्रत्युत्तरात भारताला 9 धावाच करता आल्या. श्रीलंकेने अशाप्रकारे विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडियाला ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये पोहचायचं असेल तर बुधवारी 17 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे कर्णधार तिलक वर्मा आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाड हे दोघे नेतृत्वाच्या जबाबदारीसह अनुभवी खेळाडू म्हणून कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us