नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट मध्ये अजूनही विराट कोहलीचाच मुख्य प्रश्न आहे. विराट कोहलीला अजून सूर गवसलेला नाही. तो कधी फॉर्म मध्ये येणार, असा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आता स्वत: विराट कोहलीनेच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने भारतीय सिलेक्टर्सना त्याचा प्लान सांगितला आहे. आशिया कपसाठी उपलब्ध राहणार असं त्याने सांगितलं आहे. विराट भारताला आशिया चषक स्पर्धेत चॅम्पियन बनवण्यासाठी मदत करताना दिसू शकतो.
आशिया कप आधी भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. त्यासाठी काल 30 जुलैला संघाची निवड करण्यात आली. आधी विराट कोहलीचा या दौऱ्यासाठी संघात समावेश करण्यात येईल, अशी चर्चा होती. पण 15 सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. विराट सध्या ब्रेकवर आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
विराट कोहलीने आपल्या प्लान बद्दल सिलेक्टर्स सोबत चर्चा केली आहे, असं पीटीआयच्या हवाल्याने माध्यमांनी वृत्त दिलं आहे. विराट आशिया कपसाठी उपलब्ध असेल. “विराट कोहलीने भारतीय निवड समितीला आपल्या उपलब्धतेविषयी माहिती दिली आहे. तो आशिया कपसाठी उपलब्ध असेल” असं पीटीआयने बीसीसीआय मधील सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पुन्हा एकदा शिखर धवनकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. भारताचा झिम्बाब्वे दौरा 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान आहे. या दौऱ्यात टीम इंडिया एकूण 3 वनडे सामने खेळणार आहे. सर्व सामने हरारे मध्ये होतील. भारतीय संघ दीपक चाहर आणि वॉशिंग्टन सुंदरची संघात निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातील खेळाडूच झिम्बाब्वे मध्ये खेळताना दिसू शकतात.