
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील यंदाच्या टी20 विश्वचषकातील सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. तब्बल 2 वर्षानंतर हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असल्याने सर्वचजण या सामन्यासाठी उत्सुक आहेत. त्यात कोणता खेळाडू कशी कामगिरी करेल? या प्रश्नाचं उत्तर देखील प्रत्येकाला हवं असून सर्वाधिक नजरा या दोन्ही संघाच्या कर्णधारांवर असणार आहेत. पाकिस्तानचा बाबर आजम आणि भारताचा विराट कोहली. या दोघांची कामगिरी पाहण्याजोगी असले. पण आतापर्यंतचा टी20 विश्वचषकाचा इतिहास पाहता कोहली पाकिस्तान संघाला पुरुन उरला आहे.

विराट कोहली सर्वात आधी टी20 विश्वचषक खेळला होता तेव्हा 2012 साली भारतासमोर पाकने 129 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यावेळी विराटने एकट्याने नाबाद 78 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2014 सालच्या टी20 विश्व कपच्या सामन्यातही पाकिस्तानला भारताने 130 धावांत रोखलं. त्यावेळीही विराटने महत्त्वपूर्ण नाबाद 36 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

2016 टी20 विश्व चषकातही कोलकात्याच्या इडन गार्डन्समध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात 118 धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. यावेळीही कोहलीने 37 चेंडूत नाबाद 55 धावा करत संघाचा विजय पक्का केला होता.

अशारितीने आतापर्यंत प्रत्येक टी20 विश्वचषक सामन्यात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध आग ओकली आहे. पाकिस्तानविरुद्ध विराटने एकूण 6 टी20 सामन्यात 2 अर्धशतकांसह 254 धावा केल्या आहेत.