वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार की नाही? रवींद्र जडेजाने निवड समितीवरच ठेवलं बोट

कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही त्याने जबरदस्त खेळी केली. दुसऱ्या कसोटीच्या पाहिल्या डावात फलंदाजी मिळाली नाही. पण गोलंदाजीत कमाल केली. असं असताना रवींद्र जडेजाने निवडकर्त्यांवर बोट ठेवलं आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार की नाही? रवींद्र जडेजाने निवड समितीवरच ठेवलं बोट
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार की नाही? रवींद्र जडेजाने निवड समितीवरच ठेवलं बोट
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 11, 2025 | 7:13 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत रवींद्र जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र असं असूनही रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. रवींद्र जडेजाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे चांगल्या फॉर्मात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे संघात त्याची नियुक्ती व्हायला हवी होती, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. कारण रवींद्र जडेजा बॅट आणि बॉलने तितकीच प्रभावी कामगिरी करतो. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर रवींद्र जडेजाची प्रतिक्रिया समोर आली आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाने 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेबाबत महत्त्वाचं भाष्य केलं. तसेच मुख्य निवडकर्ता अजित आगरकर याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर रवींद्र जडेजा म्हणाला की, ‘अर्थातच मला 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळायची इच्छा आहे. निवडीपूर्वी माझं निवड समितीसोबत बोलणं झालं आहे. चांगली गोष्ट अशी आहे की निवड प्रक्रिया पार करण्यापूर्वी निवडकर्ते आणि कर्णधाराने माझ्याशी चर्चा केली. त्यांनी मला समजावलं, पण मला कारण काही समजलं नाही. वनडे वर्ल्डकप जिंकणं हे सर्वांचं स्वप्न असतं.’ रवींद्र जडेजाने आपल्या वक्तव्यातून थेट निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला डाव शुबमन गिलने 518 धावांवर घोषित केला. गिलच्या निर्णयामुळेस्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण त्याने आपल्या गोलंदाजीची कसब दाखवली आणि वेस्ट इंडिजला बॅकफूटवर ढकललं.रवींद्र जडेजा मागच्या वर्षापासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. मग ते वनडे असो की कसोटी… दोन्ही ठिकाणी त्याने आपलं योगदान दिलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात तर जडेजाने शतक ठोकलं होतं. तसेच दुसऱ्या डावात चार विकेट घेतल्या होत्या. आताही त्याने तीन विकेट घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाने 14 षटकांमध्ये 37 धावा दिल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवसाअखेर 4 विकेट्स गमावून 140 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा संघ टीम इंडियापेक्षा 378 धावांनी पिछाडीवर आहे.