T20 World Cup Final : सूर्यकुमार यादवचा न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरला टोला, म्हणाला काही तरी नवीन बोला…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडकडून वाकयुद्ध सुरू झालं आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससारखी भाषा वापरली आहे. त्यावर आता सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सांगता भारत न्यूझीलंड अंतिम सामन्याने होणार आहे. या सामन्यात कोण जेतेपद मिळवणार हे अवघ्या काही तासात समजेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने भारतीय संघाला डिवचलं आहे. अगदी तसंच जसं 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पॅट कमिन्सने केलं होतं. सँटनरने भारतीय चाहत्यांना मैदानात गप्प करू अशीच भाषा वापरली आहे. कोणाची मनं दुखावली तर पर्वा नसल्याचं वक्तव्य मिचेल सँटनर याने केलं आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी वाकयुद्ध रंगलं आहे. टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळल्यानंतर प्रतिक्रिया येणार नाही असं कसं होईल. कर्णधार सूर्यकुमार यादव याची पत्रकार परिषद पार पडली. यात त्याला पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला. त्यावर सूर्यकुमार यादवने त्याच्या अंदाजात उत्तर दिलं.
कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘काहीतरी नवीन आणा. प्रत्येक जण तेच बोलत आहे.’ सूर्यकुमार यादवने एका वाक्यातच त्या प्रश्नाचं उत्तर संपवलं. यापूर्वी उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सॅम करनने असंच वक्तव्य केलं होतं. पण टीम इंडियाने इंग्लंडला गप्प करून घरी पाठवलं. त्यामुळे मिचेल सँटनरच्या या वक्तव्यामुळे उद्याचा निकाल काय लागतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनचं कौतुक केलं. संजू सॅमसनने सांगितलं की, ‘संजू सॅमसन खूपच मेहनत घेत आहे. जेव्हा खेळत नव्हता तेव्हाही मेहनत करत होता आणि त्याने संघासाठी खूप काही केलं आहे.’
न्यूझीलंडचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतासाठी कायम डोकेदुखी ठरला आहे. दोन्ही तीन वेळा या स्पर्धेत आमनेसामने आले होते. तिन्ही वेळेस न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. दुसरीकडे, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 2023 मध्ये भारताला वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडिया आयसीसी स्पर्धेचे गैरसमज आहेत. ते विजयाने दूर करेल, अशी आशा क्रीडाप्रेमी करत आहेत.
