IMD Alert : महाराष्ट्र तापणार! पुढील काही दिवस धोक्याचे, हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी
IMD Heatwave Alert : उत्तर आणि मध्य भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढले असल्याचे दिसत आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमधील तापमानात वाढ होताना दिसत आहे. उत्तर आणि मध्य भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढले असल्याचे दिसत आहे. निरभ्र आकाश आणि बहुतेक राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभ नसल्याने मार्चमध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उत्तर आणि पश्चिम भारतात तापमान वेगाने वाढत आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या राज्यांमध्ये उष्णता वाढणार
हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, पश्चिम राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये 7-10 मार्चसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. तसेच आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडूमधील जिल्ह्यांसाठीही उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. तसेच 10 आणि 11 मार्च रोजी पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. 9 मार्च रोजी कोकणात आणि 9 आणि 10 मार्च रोजी गुजरातच्या किनारी भागात तीव्र उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. तसेच 7 आणि 8 मार्च रोजी दक्षिण आणि मध्य किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या रायलसीमा आणि उत्तर तामिळनाडू जिल्ह्यांच्या अनेक भागातही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णता वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अमरावतीमध्ये 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात उष्णता वाढली आहे. राजस्थानमधील जैसलमेर आणि जोधपूर या वाळवंटी भागात तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. तसेच गेल्या 24 तासांत, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागात कमाल तापमान 37-41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती येथे 40.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे.
उत्तर भारतातही तापमान वाढले
उत्तर भारतातील हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानमध्ये तापमान सामान्यपेक्षा 3-7 अंश सेल्सिअस जास्त नोंदवण्यात आले आहे. उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, गुजरात, कोकण आणि गोवा येथे सामान्यपेक्षा 2-5 अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदवण्यात आले आहे. आगामी काळात या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
