Suresh Raina | ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून आलेल्या विराटवर क्रिकेटपटू सुरेश रैनाचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 04, 2021 | 8:35 PM

भारताचा आघाडीचा क्रिकेट खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) कर्णधार कोहलीच्या मायदेशी परतण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

Suresh Raina | ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून आलेल्या विराटवर क्रिकेटपटू सुरेश रैनाचं मोठं वक्तव्य
Follow us on

नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat kohli) ऑस्ट्रेलिया  (India Vs Australia) टूर सोडून मायदेशात परतला आहे. पालकत्व रजा टाकून तो त्याची गरोदर पत्नी अनुष्कासोबत (Anushka Sharma) सध्या आहे. कोहलीच्या या निर्णयाचं अनेकांनी समर्थन केलं आहे तर काहींनी मात्र देशासाठी खेळण्याला कोहलीने प्राथमिकता द्यायला हवी होती, असं म्हणत कोहलीवर प्रहार केलेत. भारताचा आघाडीचा क्रिकेट खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) मात्र कोहलीच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. (Cricketer Suresh Raina Comment On Virat Kohli)

विराट कोहलीच्या मायदेशी परतण्यावर सुरेश रैनाने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सुरेश रैना म्हणाला, “विराट कोहलीचा हा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु त्याने घेतलेला निर्णय बरोबरच आहे असं मी म्हणेन. जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला होता तेव्हा मी ही असाच निर्णय घेतला होता. कारण हा खेळ आज तुमच्यासोबत आहे परंतु उद्या सोबत असेलच असं नाही. शेवटी कुटुंब आपल्यासोबत नेहमीच असते. आपल्या कुटुंबाला जेव्हा आपली गरज असेल तेव्हा आपण तिथे असायला हवं”.

“विराट कोहलीने आपल्या पत्नीबरोबर राहण्याचा आणि तिची या गरोदर काळात काळजी घेण्याचा योग्य निर्णय घेतला आहे”, असं म्हणत विराटने घेतलेल्या निर्णयाचं रैनाने समर्थन केलं आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या युएईमध्ये खेळल्या गेलेल्या 13 व्या सत्रापूर्वी सुरेश रैना स्वत: वैयक्तिक कारणास्तव भारतात परतला होता.

“कोरोनासारख्या महामारीच्या काळात प्रत्येकालाच वाटतं की आपण आपल्या कुटुंबासोबत असायला हवं. खेळाडूंनाही असं वाटतं. शेवटी कुटुंबाविषयी सतत विचार केला तर मग खेळावरही लक्ष लागत नाही”, असंही रैना म्हणाला.

“विराटने देशासाठी अनेक अविस्मरणीय सिरीज खेळल्या आहेत. देशासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी साकारत संघाला महत्त्वपूर्ण मॅचेस जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे कौटुंबिक गरजेवेळी त्याला कुटुंबासोबत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे”, असं सरतेशेवटी रैना म्हणाला.

अ‌ॅडलेड टेस्टमध्ये विराटच्या नेतृत्वात भारत ऑस्ट्रेलियाविरोधात केवळ 36 रन्समध्ये ऑलआऊट झाला होता. त्यानंतर संघाचं मनोधैर्य फारच खचलं होतं. अशावेळी विराटने संघाला सोडून जाऊ नये, असं अनेक दिग्गजांचं मत होतं. मात्र काही क्रिकेटपटूंनी विराटच्या निर्णयाचं समर्थनही केलेलं दिसून आलं.

हे ही वाचा

Moeen Ali | इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीला कोरोना, श्रीलंकेत संसर्ग

aus vs india | टीम इंडिया सिडनीमध्ये दाखल, हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई