युवराज सिंह निवृत्तीनंतर काय करणार? प्लॅन सांगितला!

| Updated on: Jun 10, 2019 | 5:18 PM

माध्यमांसमोर आपल्या निवृत्तीची घोषणा करताना युवराज भावूक झाला होता. निवृत्तीची घोषणा करताना त्याने चाहत्यांचेही आभार मानले. तसेच निवृत्तीनंतर काय करणार याचीही माहिती दिली.

युवराज सिंह निवृत्तीनंतर काय करणार? प्लॅन सांगितला!
Follow us on

मुंबई : युवराज सिंह असा खेळाडू आहे ज्याने भारतीय संघाला दोन विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले. भारताने 2007 रोजी T-20 आणि 2011 रोजी विश्वचषकावर आपले नाव कोरले तेव्हा युवराज भारतीय संघाचा भाग होता. आज त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 19 वर्षांचे क्रिकेट करिअर आज संपले, असे म्हणत युवराजने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. माध्यमांसमोर ही घोषणा करताना युवराज भावूक झाला होता. मात्र, युवराजचे भविष्यातील काय प्लॅन आहे हाही प्रश्न त्याच्या अनेक चाहत्यांना पडला.

युवराजने निवृत्तीची घोषणा करताना आपल्या चाहत्यांचे आभार तर मानलेच, सोबत निवृत्तीनंतर तो काय करणार याचीही माहिती त्याने आपल्या चाहत्यांना दिली. युवराज म्हणाला, “आयुष्यातील एक मोठा काळ क्रिकेटसाठी दिल्यानंतर मी आता पुढे जाण्याचा विचार केला आहे. आता मी कँसर रुग्णांसाठी काम करत लोकांना मदत करणार आहे.”

‘You We Can’ संस्थेच्या माध्यमातून कँसर पीडितांसाठी काम करणार

‘सिक्सर किंग’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या युवराजने आता येणाऱ्या काळात ‘You We Can’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून देशभरात कँसर पीडितांसाठी कॅम्प घेणार असल्याचे सांगितले. या रुग्णांना आर्थिक असो की इतर कोणत्याही शक्य त्या पद्धतीने मदत करणार असल्याचेही युवराजने नमूद केले.

युवराजने स्वतः कँसरचा सामना करत क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले होते. 2011 च्या विश्वचषकानंतर युवराजला कँसरचे स्पष्टपणे निदान झाले होते. त्यानंतर त्याने जवळजवळ 2 वर्षे कँसरसोबत लढाई केली. त्यातून बरे झाल्यावर त्याने कँसर पीडितांना मदत करण्यासाठी ‘You We Can’ ही संस्थाही स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून युवराज अनेक कँसर पीडितांना मदत करत आहे.

निवृत्तीची घोषणा करताना केलेल्या आपल्या मनोगतात युवराज सिंहने अनेकांचे आभार मानले. संघाचे खेळाडू, माजी कर्णधार, बीसीसीआय, निवड समिती आणि आई शबनम सिंह यांचा यात समावेश होता. या व्यतिरिक्त युवराजचे गुरु बाबा अजित सिंह आणि बाबा राम सिंह यांचाही या यादीत समावेश होता.

मागील मोठ्या काळापासून युवराज भारतीय संघाबाहेर होता. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करुनही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. याची बोच युवराजच्या मनातही होती. त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना याचाही उल्लेख केला.