“धोनीच्या बळावर संघ चालतो, त्याच्याशिवाय विश्वचषक जिंकणं अशक्य”

| Updated on: Jul 04, 2019 | 9:00 PM

भारतीय संघातील खेळाडूंसाठी धोनी बहुमूल्य आहे. धोनी संघाचा एक मजबूत भाग असून त्याच्या बळावर संघ चालतो, असं कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने यापूर्वीही म्हटलंय. पण इतर खेळाडूंचंही हेच म्हणणं आहे.

धोनीच्या बळावर संघ चालतो, त्याच्याशिवाय विश्वचषक जिंकणं अशक्य
Follow us on

लंडन : विश्वचषकाच्या सेमीफायनलला लवकरच सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या फॉर्मबद्दल दिग्गज खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पण भारतीय संघातील खेळाडूंसाठी धोनी बहुमूल्य आहे. धोनी संघाचा एक मजबूत भाग असून त्याच्या बळावर संघ चालतो, असं कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने यापूर्वीही म्हटलंय. पण इतर खेळाडूंचंही हेच म्हणणं आहे.

भारतीय संघातील एका खेळाडूने ‘आयएएनएस’शी बोलताना धोनीचं भारतीय संघासाठी असलेलं महत्त्व समजावून सांगितलं. सर्व जण धोनीच्या फलंदाजीवर बोलत आहेत, पण कुणी याकडे पाहत नाही की त्याला कोणत्या फलंदाजांसोबत खेळावं लागतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर आपण फलंदाजीमध्ये इंग्लंडसारखे नाहीत. त्यांच्याकडे शेपटी आहे. माही भाई खेळायला येतो तेव्हा त्याला तळाच्या फलंदाजांसोबत खेळावं लागतं. बेन स्टोक्ससारखं खेळण्यासं स्वातंत्र्य त्याच्याकडे नसतं. इंग्लंडची फलंदाजी 10 व्या क्रमांकापर्यंत मजबूत असते, पण आपलं तसं नाही. बांगलादेशविरुद्ध माही बाद होताच आपल्या अखेरच्या षटकात दोन विकेट गेल्या होत्या, अशी आठवणही या खेळाडूने करुन दिली.

माहीच्या अनुभवाबाबत बोलायचं झालं तर ती एक अशी व्यक्ती आहे, जिच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. जर प्लॅन ए काम करत नसेल तर धोनी तुम्हाला लगेच प्लॅन बी, सी आणि डी देतो. बांगलादेशविरुद्धचा सामना पाहिला असेल, तर रिषभ पंतला माही सतत सांगत होता की कोणता शॉट कसा मारायला हवा. तुम्हाला हा अनुभव कुठे बाजारात विकत मिळणार नाही, असंही या खेळाडूने म्हटलंय.

आणखी एका दुसऱ्या खेळाडूशीही या वृत्तसंस्थेने बातचीत केली. धोनीच्या अनुभवामुळेच विराट कोहली बिनधास्तपणे सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करु शकतो. विराट सीमारेषेवर उभा राहून चौकार वाचवू शकतो, तर माही स्टम्पच्या मागून सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करतो. काही षटकं गोलंदाजी झाल्यानंतर कुठे चेंडू टाकायला हवा यासह सर्व गोष्टी माही गोलंदाजांना समजावून सांगतो. कुठे कसा बदल करायला हवा हे माहीला माहित असतं. आमच्याकडे त्याचा कोणताही पर्याय नाही, असं या खेळाडूने म्हटलंय.

धोनी एकप्रकारे आमचा उपकर्णधार आहे. एखाद्या मोठ्या मालिकेत खेळत असू तर धोनी संघात असणंच आमच्यासाठी सर्व काही असतं. क्षेत्ररक्षणात काही बदल हवा असेल, किंवा गोलंदाजीमध्ये काही बदल करायचा असेल तर त्यावेळी धोनी आमच्यासोबत असणं हीच सर्वात मोठी गोष्ट असते. धोनीने सांगितल्याप्रमाणेच आम्ही सगळं करतो. त्याचं मार्गदर्शन कायम मोलाचं ठरतं, असं या खेळाडूने सांगितलं.

धोनीचा या विश्वचषकातील फॉर्म पाहता त्याच्या खेळावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. धोनी या विश्वचषकानंतर निवृत्ती घेऊ शकतो, असंही अनेकांचं म्हणणं आहे. पण टीम इंडियातील खेळाडूंना धोनी हवाय. कारण, 14 जुलैला लॉर्ड्सवर विश्वचषकाची ट्रॉफी उचलायची असेल तर धोनीला कोणताही पर्याय नाही असं या खेळाडूंचं ठाम मत आहे.