IND vs AUS: कांगारुंना दुहेरी झटका, दोन दिग्गज खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून बाहेर

| Updated on: Nov 30, 2020 | 10:34 AM

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली आहे.

IND vs AUS: कांगारुंना दुहेरी झटका, दोन दिग्गज खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून बाहेर
Follow us on

सिडनी : सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) काल (29 नोव्हेंबर) भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियावर 51 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला 50 षटकात 9 विकेट गमावून केवळ 338 धावाच करता आल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली आहे. (David Warner ruled out of limited over series Pat Cummins rested in ODI and T-20)

ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान कांगारुंच्या संघाला मोठा झटका बसला आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियन संघातील विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे वॉर्नर एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात तसेच आगामी टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही. वॉर्नरच्या जागी डार्सी शॉर्ट (D’arcy Short) याला संघात स्थान देण्यात आले आहे. डार्सी एकदिवसीय आणि टी-20 मध्ये संघाचं प्रतिनिधित्व करेल. दरम्यान ऑस्ट्रेलियन संघातील जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सला भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना डेव्हिड वॉर्नरने एक चेंडू अडवण्यासाठी डाईव्ह मारली होती. त्याने टेंडू अडवला खरा, परंतु त्यादरम्यान त्याला दुखापत झाली. त्यानंतर वॉर्नरने मैदान सोडलं. त्याला मैदानातून बाहेर नेत असताना त्याच्या हलचालींवरुन स्पष्ट झालं होतं की, त्याची दुखापत मोठी असणार. वॉर्नरला बॉडी स्कॅनिंगसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील मर्यादित षटकांच्या सामन्यातून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वॉर्नरपूर्वी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसदेखील दुखापतग्रस्त असल्याने त्यालादेखील विश्रांती देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियन संघातील तीन महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकणं कांगारुंच्या संघासाठी सोपं नसणार. मालिका जरी ऑस्ट्रेलियाने जिंकली असली तर भारताला व्हाईट वॉश देण्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा प्रयत्न असणार आहे. परंतु प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ते सोपं नसणार.

डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्स हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेत संघात परततील असा विश्वास संघाचे प्रशिक्षक जस्टिन लेंगर यांनी व्यक्त केला आहे. लेंगर म्हणाले की, हे दोन्ही खेळाडू आमच्यासाठी अतिमहत्त्वाचे आहेत. डेव्ही त्याच्या दुखापतीमधून सावरण्यासाठी फिटनेस ट्रेनिंग पूर्ण करेल. तर पॅटला विश्रांती देण्यात आल्याने तो कसोटी मालिकेत पूर्ण तयारिनिशी उतरेल. तो आमचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्यामुळे कसोटी मालिकेत तो शारिरिक आणि मानसिकरित्या स्वस्थ असणं आवश्यक आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची टीम इंडियावर 51 धावांनी मात, मालिकाही खिशात

दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी, डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच आणि मार्नस लाबुशानेच्या अर्धशतकी खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 389 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 104 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने 83 धावांची खेळी केली. मार्नस लाबुशानेने 61 चेंडूत 5 फोरसह 70 धावा केल्या. फिंचने 69 चेंडूत 6 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 60 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूत प्रत्येकी 4 फोर आणि सिक्सच्या मदतीने नाबाद 63 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, जस्प्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली. मयंक अग्रवाल आणि शिखर धवन या जोडीने 58 धावांची सलामी दिली. यानंतर शिखर धवन 30 धावांवर बाद झाला. धवनने 23 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा केल्या. धवन पाठोपाठ मयंक अग्रवालही माघारी परतला. मयंकने 28 धावा केल्या.

सलामी जोडी माघारी परतल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र विराटने श्रेयस अय्यरसह डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. यादरम्यान विराटने आपले अर्धशतक पूर्ण केलं. ही जोडी तोडायला मोइसेस हेनरिकेसला यश आले. याने श्रेयसला 38 धावांवर बाद केलं. श्रेयस अय्यरनंतर के.एल. राहुल मैदानात आला. केएल-विराट या जोडीने चौथ्या विकेटसाठी 72 धावा जोडल्या. यानंतर कर्णधार विराट 89 धावांवर बाद झाला. विराटने 87 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या.

विराटनंतर हार्दिक पांड्या मैदानात आला. केएलने हार्दिकसह पाचव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. ही जोडीने चांगलीच जमली होती. मात्र झॅम्पाने ही जोडी फोडली. झॅम्पाने के.एल. ला 76 धावांवर बाद केलं. के.एल.ने 66 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 76 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके द्यायला सुरुवात केली. रवींद्र जडेजाने 24, हार्दिक पांड्याने 28 धावांची खेळी केली.

(IND vs AUS : David Warner ruled out of limited over series Pat Cummins rested in ODI and T-20)