MI vs PBKS : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतरही कर्णधार हार्दिक पांड्याने केली कानउघडणी, म्हणाला..
आयपीएल 2024 स्पर्धेतील सर्वात रंगतदार सामना हा मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झाला. कधी सामना इथे तर कधी तिथे अशी स्थिती होती. अखेर मुंबई इंडियन्सने या सामन्यात 9 धावांनी बाजी मारली. पण या सामन्यानंतर हार्दिक पांड्यांनी खेळाडूंची कानउघडणी करण्याची संधी सोडली नाही. सामन्यानंतर बरंच काही बोलून गेला.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर 9 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीला आली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 गडी गमवून 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना पंजाब किंग्सची सुरुवात एकदम घाण झाली. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. पण शशांक सिंग, आशुतोष शर्मा आणि हरप्रीत ब्रार यांच्या खेळीमुळे सामन्याला रंगत आली. आशुतोष खेळपट्टीवर उभा असेपर्यंत सामना पंजाबच्या पारड्यात झुकलेला होता. मात्र त्याची विकेट पकडताच मुंबई इंडियन्सच्या जीवात जीव आला. शेवटपर्यंत विजयासाठी धडपड करत असताना मुंबई इंडियन्सला विजय मिळाला. पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ 19.1 षटकात 183 धावा करू शकला आणि 9 धावांनी मुंबई इंडियन्सला विजय मिळाला.
सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याला विजयाबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने सुरुवातीला हा सामना खरंच खूप छान झाल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर खेळाडूंची सौम्य भाषेत कानउघडणीही केली. “प्रत्येकाची आज खऱ्या अर्थाने परीक्षा झाली. मी सामन्याआधीच सांगितलं होतं की, या सामन्यात तुमचं खरं कौशल्य दिसणार आहे. पहिल्यांदा आम्हाला वाटलं की आम्ही सामन्यात पुढे आहोत. पण हे आयपीएल आहे, इथे काहीही होऊ शकतं.”, असं सांगत हार्दिक पांड्याने खेळाडूंना खडे बोल सुनावले. हार्दिक पांड्याने आशुतोष शर्माचंही कौतुक केलं. “विश्वास बसत नाही, तो आला आणि जबरदस्त खेळला. प्रत्येक चेंडू त्याच्या बॅटच्या बरोबर मध्यभागी लागत होता. त्याच्यासाठी खरंच आनंदी आहे, भविष्यासाठी त्याला शुभेच्छा.”
टाईमआऊटमधील चर्चाही हार्दिक पांड्याने उघड केली. “आम्ही सामन्यात दिसत असलो तर पकड दिसत नव्हती यावर टाईम आऊटमध्ये चर्चा करत होतो. गेममध्ये येण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु होते. काही षटकांमध्ये खरंच आम्ही खूपच खराब खेळलो. पण तरीही विजय हा विजय असतो.” असं हार्दिक पांड्या पुढे म्हणाला. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या खात्यात दोन गुणांची भर पडली आहे. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सला मात देत सातव्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 22 एप्रिलला राजस्थान रॉयल्ससोबत आहे.