Rahul Dravid : ‘वाटलं नव्हतं काही महिन्यात 6 कर्णधारांसोबत काम करावं लागेल’, टी-20 मालिकेदरम्यान राहुल द्रविडचं वक्तव्य

राहुल द्रविडने टी-20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शिखर धवन यांच्या कर्णधारपदाच्या काळात प्रशिक्षक म्हणून द्रविडला काम पाहावं लागलं.

Rahul Dravid : वाटलं नव्हतं काही महिन्यात 6 कर्णधारांसोबत काम करावं लागेल, टी-20 मालिकेदरम्यान राहुल द्रविडचं वक्तव्य
राहुल द्रवीड, प्रशिक्षक, भारतीय क्रिकेट संघ
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 19, 2022 | 10:51 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळून राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना साधारण 8 महिने पूर्ण झाले. बंगळुरुमध्ये साऊथ आफ्रीका विरोधात सुरु असलेल्या शेवटच्या टी -20 मॅचवेळी राहुल द्रविड यांनी आपल्या टीम इंडियाच्या प्रशिक्षक (Indian Cricket Coach) पदाबाबत भाष्य केलं. यावेळी राहुल द्रविडने मस्करीच्या मुडमध्ये म्हटलं की, मला वाटलं नव्हतं की सुरुवातीलाच 6 कर्णधारांसोबत काम करावं लागेल. तसंच हा प्रवास आतापर्यंत खूप चांगला राहिला, अनेक आव्हानंही होती. मी विचार केला नव्हता की पहिल्या 8 महिन्यातच 6 कर्णधारांसोबत (Captain) काम करावं लागेल. मात्र, कोरोनामुळे हे नॉर्मल बनलं. कारण तुम्हाला वर्कलोड, प्लेयर्स अशा सर्वांना मॅनेज करावं लागतं. त्यात कर्णधारपदही आलंच, असंही तो म्हणाला.

राहुल द्रविडने टी-20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शिखर धवन यांच्या कर्णधारपदाच्या काळात प्रशिक्षक म्हणून द्रविडला काम पाहावं लागलं आहे. द्रविड म्हणाला की, वेगवेगळ्या कर्णधारांसोबत काम करणं आव्हानात्मक असतं. मात्र, नवं नेतृत्व तयार होण्यासाठी हे चांगलं आहे. एका समुहाच्या दृष्टीने आम्ही शिकत आहोत आणि आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत.

पावसामुळे सामना रद्द, मालिका 2-2 ने बरोबरीत

बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पाचवा आणि शेवटचा टी -20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आलाय. त्यामुळे पाच सामन्यांची ही मालिका 2 – 2 अशी बरोबर संपली आहे. तत्पूर्वी सामना सुरु होणार होता तितक्यात पावसाला सुरुवात ढाली. त्यामुळे खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं. त्यानंतर पाऊस थांबला आणि सामना 20 षटकांऐवजी 19 षटकांचा करण्यात आला.

सामन्याला सुरुवात झाल्यानंतर भारताचा सलामीवीर इशान किशनने आक्रमक सुरुवात केली. साऊथ आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने पहिलं षटक टाकलं. या ओव्हरमध्ये 16 धावा निघाल्या त्यात दोन षटकारांचा समावेश होता. मात्र, काही वेळातच भारताला पहिला झटका बसला. सलामीवीर इशान किशनला लुंगी निगीडीने बोल्ड केलं. किशन 15 धावा करत परतला. मात्र, पुन्हा पावसाला सुरुवात झाली तेव्हा 3.3 षटकात भारताची स्थिती 28 धावांवर दोन बाद अशी होती.

काही वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहिली गेली. मात्र पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे अखेर सामना रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केली.