“सचिन सहा वर्ल्डकप खेळला तेव्हा जिंकला, पण मी तर पहिल्या संधीतच…” विराट कोहलीचं आश्चर्यकारक वक्तव्य

वर्ल्डकप विजयासह सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटही गोड झाला. टीम इंडियाममध्ये तेव्हा 22 वर्षीय विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला होता. आता वर्ल्डकप विजयाबाबत विराट कोहलीने मोठं वक्तव्य केलं आहे.

सचिन सहा वर्ल्डकप खेळला तेव्हा जिंकला, पण मी तर पहिल्या संधीतच... विराट कोहलीचं आश्चर्यकारक वक्तव्य
"सचिन सहा वर्ल्डकप खेळला तेव्हा जिंकला, पण मी तर पहिल्या संधीतच..." विराट कोहलीचं आश्चर्यकारक वक्तव्य
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 25, 2023 | 3:40 PM

मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 28 वर्षानंतर टीम इंडियानं वनडे विश्वचषकावर नाव कोरलं. 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्डकप संघात सचिन तेंडुलरकरसह विराट कोहली सुद्धा होता. वर्ल्डकप विजयासह सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटही गोड झाला. टीम इंडियाममध्ये तेव्हा 22 वर्षीय विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला होता. आता वर्ल्डकप विजयाबाबत विराट कोहलीने मोठं वक्तव्य करत सांगितलं की, “सचिन तेंडुलकरने 24 वर्षे देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यांनी 6 वर्ल्डकप खेळल्यानंतर विजय मिळवला. मी तर पहिल्या संधीतच वर्ल्डकप जिंकला.” इतर खेळाडूंप्रमाणे सचिन तेंडुलकर विराट कोहलीचा आदर्श राहिला आहे. सचिनप्रमाणे विराटने फलंदाजीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. क्रिकेटमध्ये विराट कोहलीची रन मशिन म्हणून ख्याती आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला. या मुलाखतीत त्याने वर्ल्डकप विजयाबाबतही सांगितलं. “मला त्या संघात स्थान मिळणं खरंच नशिबाचा भाग होता. पण संघात माझी निवड चांगल्या खेळावर झाली होती. पण निवडीबाबत मला तशी काहीच आशा नव्हती. पण जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या तेव्हा घडतात. मी जर चुकीचा ठरत नसेल तर 2011 मध्ये सचिन तेंडुलकर आपला सहावा वर्ल्डकप खेळत होता. तेव्हा मला पहिली संधी मिळाली होती आणि आम्ही जिंकलो होतो.”, असं विराट कोहलीने सांगितलं. त्यानंतर 2013 चॅम्पियन ट्रॉफी विजयी संघातही विराट कोहलीचा समावेश होता.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न मात्र अधुरंच राहिलं आहे.पण असं असूनही विराट कोहली निश्चिंत आहे.”मी माझा ट्रॉफी रुम भरलेला असावा यासाठी वेडा नाही. पण एक शिस्त असणं गरजेचं आहे.”, असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून व्हाईट बॉल कारकिर्दही चांगली राहिली आहे. अयशस्वी कर्णधार म्हणून टीका करणाऱ्यांना विराट कोहलीने आठवण करून दिली की, भारतीय संघात एक कल्चर निर्माण केल आहे. त्याचा फायदा भारतीय संघाला भविष्यात नक्कीच होईल.

सचिन तेंडुलकरचा शेवटचा वर्ल्डकप

2 एप्रिल 2011 रोजी सचिन तेंडुलकरचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. हा सचिन तेंडुलकरचा सहावा आणि शेवटचा वर्ल्डकप होता. या संघात विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, युवराज सिंह आणि जहीर खान सारखे खेळाडू तिसरा वर्ल्डकप खेळत होते. तर गौतम गंभीर, एस श्रीसंत, सुरेश रैना, युसुफ पठाण आणि रविचंद्रन अश्विन आपला वनडे वर्ल्डक खेळत होते. या संघात विराट कोहली सर्वात तरुण खेळाडू होता.