Sunil Gavaskar : गिल सामनावीर ठरुनही गावस्करांकडून दुसऱ्या खेळाडूच भरभरुन कौतुक, असा खेळाडू कुठल्याही टीमसाठी जमेची बाजू
Sunil Gavaskar : टीम इंडियाचा अफगाणिस्तान विरुद्ध सामना झाला. पहिली वनडे भारताने जिंकली. या मॅचमध्ये शुबमन गिला सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पण सुनील गावस्करांना भारतीय संघातील दुसऱ्या एका खेळाडूने प्रभावित केलं.

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये वनडे सीरीज सुरु आहे. शनिवारी दोन्ही टीममध्ये पहिला वनडे सामना झाला. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना 25 षटकांचा खेळवण्यात आला. अफगाणिस्तानने रहमनुल्लाह गुरबाजच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर 194 धावांचा डोंगर उभारला. कॅप्टन शुबमन गिलच्या 66 चेंडूतील नाबाद 84 धावांच्या बळावर भारताने हे लक्ष्य सहज पार केलं. शुबमन गिलच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे गिल ऐवजी टीम इंडियातील एका ऑलराऊंडर खेळाडूवर प्रभावित झाले आहेत. धर्मशाळा येथे अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात नितीश कुमार रेड्डीने सुनील गावस्कर यांना आपल्या खेळाने प्रभावित केलं. चार ओव्हरमध्ये रेड्डीने 31 धावा देत दोन महत्वाचे विकेट काढले. यात 51 चेंडूत 102 धावा तडकवणाऱ्या रहमनुल्लाह गुरबाजचा विकेट होता.
गुरबाजचा विकेट टर्निंग पॉइंट ठरला. त्यामुळे टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करुन अफगाणिस्तानला 194 धावसंख्येवर रोखता आलं. भारताने हे लक्ष्य सहज गाठत सात विकेटने हा सामना जिंकला. “नितीश कुमार रेड्डीने परफेक्ट यॉर्कर टाकून रहमनुल्लाह गुरबाजचा विकेट मिळवला. जर तुम्ही असे यॉर्कर टाकत असाल, तर तुम्ही टीमसाठी अमूल्य संपत्ती आहात” असं गावस्कर जियोस्टारवर बोलताना म्हणाले. प्रत्येक वेळी त्याने काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला धावा मोजाव्या लागल्या. पण जेव्हा-जेव्हा त्याने यॉर्कर चेंडूंचा वापर केला, तेव्हा त्याला यश मिळालं” असं सुनील गावस्कर म्हणाले. नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीमुळे भारताला एक रणनितीक पर्याय मिळतो, असं गावस्करांचं मत आहे.
गावस्करांनी सांगितले या खेळाडूचे फायदे
“यात जमेची बाजू ही आहे की, भारताकडे नितीश कुमार रेड्डी सारखा खेळाडू आहे, जो पाचव्या आणि सहाव्या गोलंदाजाची जागा भरुन काढू शकतो. खेळपट्टी आणि मॅचची परिस्थिती पाहून कॅप्टन आणि निवडकर्त्यांना त्याच्याबद्दल निर्णय घेता येऊ शकतो. मला बॉलर म्हणून घ्या किंवा बॅट्समन मी तयार आहे. ही कुठल्याही टीमसाठी जमेची बाजू आहे” असं सुनील गावस्कर म्हणाले.
नितीश कुमार रेड्डी चांगला फलंदाज आहेच. पण आता त्याने त्याच्या गोलंदाजीतही सुधारणा केलीय. आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये त्याने 302 धावा केल्या आहेत. आठ विकेट काढले. मागच्या चार सीजनपैकी हा त्याच्यासाठी उत्तम सीजन ठरला.
