
टीम इंडिया आज सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना होणार आहे. या फायनलआधी टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांना मोलाचा सल्ला दिला आहे. “सुनील गावस्कर यांनी अभिषेक शर्माला प्लेइंग 11 बाहेर करण्याचा सल्ला दिला आहे. अभिषेक शर्मा त्याच्या आधीच्या चुकांमधून काही शिकलेला नाही. त्याच पद्धतीने तो आऊट होतोय” असं सुनील गावस्कर म्हणाले. 25 वर्षीय अभिषेक शर्मासाठी यंदाचा टी20 वर्ल्ड कप खास ठरलेला नाही. सात सामन्यात त्याने 12.71 च्या सरासरीने फक्त 89 धावा केल्या आहेत.
सुपर-8 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्याने हाफ सेंच्युरी झळकवली नसती तर 89 पेक्षा पण त्याचा आकडा अजून खराब असता. टुर्नामेंटमध्ये तो तीनवेळा शुन्यावर आऊट झालाय. टी20 वर्ल्ड कपमध्ये चारवेळा स्पिनरने त्याची विकेट काढलीय. अभिषेक शर्मा थोडाही सेट व्हायला वेळ घेत नाही. अगदी पहिल्या चेंडूपासून त्याचा तुटून पडण्याचा प्रयत्न असतो. त्या प्रोसेसमध्ये त्याची विकेट जाते. सेमीफायनल सामन्यात अभिषेक शर्मा सहज जाळ्यात अडकला. इंग्लंडचा स्पिनर विल जॅक्सला त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट दिला. 9 धावा करुन त्याने पॅव्हेलियनची वाट धरली.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
“हा खूप कठीण निर्णय आहे. अभिषेक शर्मा आयसीसी टी20 रँकिंगमध्ये नंबर 1 फलंदाज आहे. पण तो त्याच्या चुकांमधून काही शिकलेला नाही. तो सारखा त्याच भागात आऊट होतोय” असं सुनील गावस्कर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. “अभिषेक शर्मा सारखा ज्या भागात आऊट होतोय, गोलंदाज त्याच पद्धतीची बॉलिंग करुन त्याला चुका करायला भाग पाडतायत. माझी चिंता ही आहे की, त्याने अजून जुळवून घेतलेलं नाही किंवा त्याला त्याच्या भूमिकेत बदल करता येत नाहीय” असं गावस्कर म्हणाले.
काही चांगल्या गोष्टी घडतात
“अभिषेक शर्माच्या जागी रिंकू सिंहला आणून इशान किशनला संज सॅमसनसोबत ओपनिंगला पाठवा” असा सल्ला सुनील गावस्कर यांनी दिला आहे. मला इशान किशनला संजू सॅमसनसोबत ओपन करताना पहायला आवडेल. गॉड्स प्लान नावाचा टॅटू तुम्ही रिंकूच्या शरीरावर पाहिला असेल. त्याच्या सारख्या खेळाडूच्या बाबतीत काही चांगल्या गोष्टी घडतात” असं गावस्कर म्हणाले.