Suryakumar Yadav : मी म्हटलं कसं शक्य आहे, पण..टी20 वर्ल्ड कप जिंकूनही संघातून वगळण्यावर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच सोडलं मौन
Suryakumar Yadav : वर्ल्ड कपनंतर पुढच्या आयर्लंड आणि इंग्लंड टूरसाठी सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळालं नाही. त्याच्याजागी श्रेयस अय्यरला टी 20 टीमचं कॅप्टन बनवण्यात आलं.

टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपचं जेतेपद मिळवलं. पण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आलं. वर्ल्ड कपनंतर पुढच्या आयर्लंड आणि इंग्लंड टूरसाठी सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळालं नाही. त्याच्याजागी श्रेयस अय्यरला टी 20 टीमचं कॅप्टन बनवण्यात आलं. जुलै 2024 मध्ये सूर्यकुमार यादवची भारताच्या टी20 टीमच्या कॅप्टनपदी निवड करण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकही टी 20 मालिका गमावली नाही. भारताने त्याच्या नेतृत्वाखाली आशिया कप सुद्धा जिंकला होता. पण वर्ल्ड कप नंतर संघ निवडताना सिलेक्शन कमिटीने फॉर्मला प्राधान्य दिलं.
टीम बाहेर केल्यानंतर मनात काय विचार येत होते, त्या बद्दल सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलला. “आधी मी सिलेक्शन कमिटीचा निर्णय मान्य करण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळानंतर मला एक प्रश्न सारखा सतावत होता, असं कसं होऊ शकतं? हे कसं शक्य आहे?” असं सूर्यकुमार यादव म्हणाला. भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा यांच्याशी सूर्यकुमारने संवाद साधला. “टीमची घोषणा झाली, त्यात माझं नाव नव्हतं. त्यावेळी पहिल्यांदा मी हसलो. दबाव किंवा कठिण काळात मी हसून स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो” असं सूर्यकुमारने सांगितलं.
सूर्यकुमार यादवला काय वाटलेलं?
“जेव्हा माझं नाव नव्हतं, तेव्हा मी हसलो. मागच्या एक-दोन वर्षात जेव्हा कठीण परिस्थिती आली, गोष्टी माझ्या मनासारख्या घडत नव्हत्या. मी नेहमीच हसून स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. मला जितकी संधी मिळाली, त्यासाठी मी आभारी राहीन” असं सूर्यकु्मार म्हणाला. असा निर्णय माझ्या बाबतीत होईल अशी सूर्यकुमार यादवला अजिबात अपेक्षा नव्हती. पुढची दोन वर्ष तो सहज टीमकडून खेळत राहील असं त्याला वाटलेलं. ऑलिम्पिक, पुढचा टी 20 वर्ल्ड कप त्याचं टार्गेट होतं.
श्रेयसच्या कॅप्टनशिपवर सूर्यकुमार काय म्हणाला?
“2026 नंतर पुढची दोन वर्ष मी टीमचं नेतृत्व करीन असं मला वाटलेलं. ऑलिंम्पिक, टी20 वर्ल्ड कप याचा विचार केलेला. पण तुम्ही जो विचार करता आणि समोरचा विचार करतो, त्यात फरक असू शकतो. निवडकर्त्यांना वाटलं की, भविष्यासाठी काय चांगला निर्णय आहे तो त्यांनी घेतला. मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही” असं सूर्यकुमार यादव म्हणाला. सूर्यकुमारने श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावर कुठलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही. श्रेयसला मी दीर्घकाळापासून ओळखतो. तो चांगला खेळाडू आहेच. पण एक चांगला माणूस आहे. त्याच्या कॅप्टनशिपवरही विश्वास दाखवला.