
सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांचे टी20 वर्ल्डकप 2026 चे सामने भारतात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावरून बराच वाद झाला तरी बांग्लादेशने आठमुठी भूमिका सोडण्यास नकार दिला. अखेर , आयसीसीने त्यांना स्पर्धेतून काढून टाकले आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला. हा निर्णय बांगलादेशसाठी खूप महागात पडू शकतो आणि आयसीसी त्याविरुद्ध मोठी कारवाई करू शकते अशा चर्चा होत्या. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवारही हती. मात्र आता यासंदर्भात आयसीसीचा निर्णय आला असून त्यांनी मोठी घोषणा केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आयसीसीने बांगलादेशसाठी एक महत्त्वाची घोषणा देखील केली आहे.
बांगलादेशला शिक्षा काय ?
टी20 वर्ल्ड कपमधील अनुपस्थितीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे जाहीर केले आहे. यासह, बीसीबीला एक मोठी भेट मिळाली आहे. ते म्हणजे, बांगलादेश 2028 ते 2031 दरम्यान आयसीसीच्या एका स्पर्धेचे आयोजन करेल. बांगलादेशला कोणत्याही आर्थिक, क्रीडा किंवा प्रशासकीय दंडाला सामोरे जावे लागणार नाही असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. याशिवाय, बीसीबीचा डिस्प्यूट रिझोल्यूशन कमिटी (डीआरसी) कडे जाण्याचा अधिकारही अबाधित राहील.
आयसीसीने एक अधिकृत मीडिया रिलीज जारी करून याची घोषणा केली आहे. लाहोरमध्ये आयसीसी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीबी यांच्यातील चर्चा संपली आहे. या चर्चेत 2026 चा टी20 वर्ल्डकप आणि दक्षिण आशियातील क्रिकेटचे भविष्य यावर चर्चा झाली. या मीडिया रिलीजनुसार, बांगलादेशला 2028 ते 2031 दरम्यान आयसीसीच्या एका स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिली जाईल. 2031 मध्ये भारतासोबत बांगलादेश एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. त्यामुळे, त्यापूर्वी त्यांना आणखी एक स्पर्धा दिली जाईल.
ICC चीफ एक्झिक्युटिव्हचं मोठं विधान
आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्डकमध्ये बांगलादेशची अनुपस्थिती खेदजनक आहे, परंतु त्यामुळे आयसीसीची बांगलादेशप्रती असलेली कायमची वचनबद्धता बदलत नाही’ असं आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता म्हणाले. देशात खेळाची वाढ होत राहावी आणि खेळाडू आणि चाहत्यांसाठी भविष्यातील संधी बळकट व्हाव्यात यासाठी बीसीबीसह प्रमुख भागधारकांसोबत जवळून काम करण्यावर आमचे लक्ष आहे असेही त्यांनी नमूद केलं.