Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे…श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?

दांबुला येथे श्रीलंका 'अ' संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्रिकोणीय मालिकेच्या फायनल सामन्यात वैभव सूर्यवंशीने पराक्रम केला. त्याने अवघ्या 11 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने केवळ 29 चेंडूंमध्ये 94 धावा केल्या. आता यानंतर त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्याने त्याच्याबद्दलची अफवा दूर केली.

Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे...श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?
vaibhav sooryavanshi
| Updated on: Jun 22, 2026 | 8:51 AM

दांबुला येथे श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामना जिंकून भारताने त्रिकोणीय मालिका जिंकली. या सामन्यात वैभव सूर्यवंशी भारत ‘अ’ संघाच्या विजयाचा नायक ठरला. त्याने 29 चेंडूंमध्ये 94 धावांची धडाकेबाज खेळी करून भारत ‘अ’ संघाला 378 धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आणि श्रीलंका ‘अ’ संघाला 66 धावांनी मागे टाकले. वैभवने काल केवळ 11 चेंडूंत अर्धशतक झळकावले. वैभवने मागील सामन्यात झालेल्या राड्याचे उत्तर बॅटने दिले. सामन्यातील त्याच्या दमदार खेळीसाठी वैभव सूर्यवंशीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. मात्र, जेव्हा तो पुरस्कार स्वीकारायला गेला, तेव्हा त्याने स्वत: बद्दलची एक अफवा दूर केली.

सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान, निवेदकाने त्याला विचारले, “तुम्ही टी-20 क्रिकेटमध्ये खूप चांगले आहात, पण तुम्ही जास्त एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत. या स्पर्धेतून तुम्ही काय शिकलात?” वैभव म्हणाला की “मी या स्पर्धेतून खूप काही शिकलो. मात्र, आपण जास्त एकदिवसीय क्रिकेट खेळलो नाही ही गोष्ट मी स्वीकारू शकला नाही. ” वैभव सूर्यवंशीने निवेदकाला सांगितले की, “मी 50 षटकांचे सामने, म्हणजेच एकदिवसीय सामनेही खूप खेळले आहेत. मला माहीत नाही की लोकांना हे का माहीत नाही ही तर अफवा आहे.” असे बोलून 15 वर्षीय वैभव पुढे बोलू लागला.

वैभव सूर्यवंशीने दांबुल्ला येथील परिस्थिती आणि खेळपट्टीबद्दल सांगितले. तो म्हणाला की, “मला तिथे एक वेगळी खेळपट्टी आणि परिस्थिती आढळली, जिथे मला खेळायला मजा आली.” वैभवला सुरुवातीच्या सामन्यात विशेष यश मिळाले नाही. पहिल्या चार सामन्यांमध्ये त्याने फक्त 117 धावा केल्या, एकही अर्धशतक नाही आणि फक्त तीन षटकार. पण अंतिम सामन्यासारखा मोठा सामना येताच, वैभवने जणू आपल्या फलंदाजीचा वेगच बदलला. त्याने अर्धशतक झळकावले, पण त्याच्या अर्धशतकाचा वेग इतका जास्त होता की त्याने एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. वैभवने त्रिकोणीय मालिकेत 211 धावा आणि 11 षटकार झळकावले.

श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने 29 चेंडूंमध्ये 8 षटकार आणि 10 चौकारांसह 94 धावा ठोकल्या. त्याने अवघ्या 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून लिस्ट ‘अ’ क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित केला. अंतिम सामन्यातील आपल्या 94 धावांच्या खेळीसह, वैभव सूर्यवंशीने 5 सामन्यांमध्ये 11 षटकारांसह 211 धावा करून मालिका पूर्ण केली.

Follow Us