Virat Kohli : BCCI च्या नियमामुळे भडकला विराट कोहली, कोणाचीच अशी इच्छा नाही की..

कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खराब परफॉर्मन्सनंतर BCCI ने कठोर नियम काढला होता. यामधील एका नियमानुसार, कोणत्याही मालिकेदरम्यान कुटुंबाची उपस्थिती मर्यादित करण्यात आली होती. आता विराट कोहलीने याबाबत नाराजी व्यक्त केली असून तो चांगलाच भडकल्याचे दिसत आहे.

Virat Kohli : BCCI च्या नियमामुळे भडकला विराट कोहली,  कोणाचीच अशी इच्छा नाही की..
विराट कोहली का भडकला ?
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 17, 2025 | 8:51 AM

आयपीएलच्या नव्या सीझनला लवकरच सुरूवात होत असून विराट कोहली 15 मार्च रोजी त्याची आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला. याच दिवशी, फ्रँचायझीने पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स येथे ‘इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिट’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यादरम्यान टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मालिकेदरम्यान आपल्या कुटुंबीयांना खेळाडूंपासून दूर ठेवण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.
आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी त्याने बीसीसीआयच्या या नियमावर संताप व्यक्त केला. कुटुंबातील सदस्यांचा खेळाडूंच्या खराब कामगिरीशी काहीही संबंध नाही, उलट त्यांच्या उपस्थितीमुळे कामगिरी सुधारण्यास नक्कीच मदत होते, असे मत कोहलीने व्यक्त केलं आहे.

काय म्हणाला विराट कोहली ?

कसोटी मालिकेटच्या दौऱ्यात खेळाडूंच्या कुटुंबाची उपस्थिती मर्यादित केल्याबद्दल आणि खेळाडूंच्या खराब कामगिरीसाठी कुटुंबियांना जबाबदार धरल्याबद्दल विराटने निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, ‘जेव्हा मैदानावर काही गंभीर घडते तेव्हा कुटुंबियांकडे परत येणं, त्यांच्याशी बोलणं हे किती महत्त्वाचं असतं हे लोकांना समजावून सांगणे खूप कठीण आहे. हे किती महत्त्वाचे आहे हे लोकांना समजतं, असं मला वाटत नाही. म्हणूनच मी खूप निराश आहे, कारण ज्यांचे (कुटुंबियांचे) खेळावर नियंत्रण नाही त्यांना लक्ष्य केले जाते. त्यांना दोष दिला जातो आणि कदाचित त्यांना ( कुटुंबियांना) दूर ठेवणे आवश्यक आहे अशी चर्चा सुरू होते’ असं कोहली म्हणाला.

कामगिरी सुधारण्यात मदत

कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे, त्यांच्या सपोर्टमुळे खेळाडूंची कामगिरी सुधारण्यास कशी मदत होते, ते कोहलीने समजावण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचाराल तर तुमचे कुटुंब नेहमी तुमच्या आसपास असावे असे तुम्हाला वाटते का? तर त्याचं उत्तर असेल, हो..’ असे विराट म्हणाला. ‘ एखाद्या खराब कामगिरीनंतर किंवा अपयशानंतर कोणलाचा खोलीत परत येऊन उदास बसण्याची इच्छा नसते. प्रत्येक खेळाडूला सामान्य, नेहमीसारखं रहायती इच्छा असते. प्रत्येक जण या खेळाकडे जबाबदारीने पाहतो. ती जबाबदारी पूर्ण करण्याचा आणि सामान्य जीवन जगण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो ‘ असं कोहली म्हणाला.

BCCI चा नियम काय ?

टीम इंडियाला गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियात सलग दोन मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही अत्यंत खराब झाली होती. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडू वाईटरित्या फ्लॉप ठरले. यानंतर बीसीसीआयने कठोर प्रवास धोरण जाहीर केले होते आणि परदेशी दौऱ्यांमध्ये खेळाडूंच्या कुटुंबीयांची उपस्थिती मर्यादित केली होती. नियमानुसार, आता भागीदार आणि खेळाडूंची मुले दोन आठवड्यांसाठी प्रत्येक मालिकेत एकदाच येऊ शकतात. यामुळे कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी असे कोणतेही बंधन नव्हते.

Follow Us