संघ व्यवस्थापनाने साथ दिली नाही, आणखी एक विश्वचषक खेळलो असतो : युवराज

| Updated on: Sep 27, 2019 | 11:13 PM

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या काळात संघ व्यवस्थापनाने साथ दिली नाही, असा आरोप भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने (Indian Cricketer Yuvraj Singh) केला आहे.

संघ व्यवस्थापनाने साथ दिली नाही, आणखी एक विश्वचषक खेळलो असतो : युवराज
Follow us on

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या काळात संघ व्यवस्थापनाने साथ दिली नाही, असा आरोप भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने (Indian Cricketer Yuvraj Singh) केला आहे. संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा मिळाला असता, तर 2011 मधील शानदार प्रदर्शनानंतर आणखी एक विश्वचषक (Cricket World Cup) खेळलो (Dream of Yuvraj Singh) असतो, असंही युवराजने नमूद केलं. 2011 मध्ये दमदार कामगिरी करुनही मला आणखी एक विश्वचषक खेळता आला नाही. संघ व्यवस्थापनाकडून मला काहीही सहकार्य मिळालं नाही, याचं मला दुःख होतं. मला जर त्याप्रकारे पाठिंबा मिळाला असता तर कदाचित मी आणखी एक विश्वचषक सामना खेळू शकलो असतो.’

युवराज म्हणाला, ‘मी जे काही क्रिकेट खेळले आहे ते माझ्या स्वतःच्या जोरावर खेळलो. माझा कोणीही ‘गॉडफादर’ नव्हता. फिटनेससाठी अत्यावश्यक ‘यो-यो टेस्ट’ (Yo Yo Test) उत्तीर्ण करुनही माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संघ व्यवस्थापनाला माझ्यापासून पळण्याऐवजी माझ्या करिअरविषयी स्पष्टपणे बोलायला हवे होते. मला 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफीनंतर 8 ते 9 सामन्यात दोनदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरही मला संघाबाहेर करण्यात आलं. याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी दुखापतग्रस्त झालो आणि मला श्रीलंका मालिकेची तयारी करण्यास सांगितले गेले.’

‘मी या वयात ‘यो-यो’ चाचणी उत्तीर्ण करु शकणार नाही असं अनेकांना वाटलं’

युवराज म्हणाला (Yuvraj Singh on his retirement) , ‘अचानक मला परत यावं लागलं आणि वयाच्या 36 व्या वर्षी ‘यो-यो टेस्ट’ची तयारी करावी लागली. ‘यो-यो टेस्ट’ उत्तीर्ण झाल्यावरही मला घरेलू क्रिकेटमध्ये खेळण्यास सांगण्यात आलं. त्यांना असं वाटलं होतं की मी या वयात यो-यो टेस्ट उत्तीर्ण करु शकणार नाही. त्यामुळं मला संघाबाहेर करणे त्यांना सोपं जाईल. मला वाटतं हे सर्व खूप दुर्दैवी होतं. ज्या खेळाडूने 15-16 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. त्याच्याशी संघ व्यवस्थापनाने थेट बसून बोलायला हवे होते. कुणीही माझ्याशी काहीही चर्चा केली नाही. विरेंद्र सेहवाग आणि जहीर खान यांनाही कुणी काहीही सांगितले नाही.’