‘सिक्सर किंग’चा जलवा कायम, ग्लोबल टी20 मध्ये पाच षटकारांसह 22 चेंडूत 51 धावा

| Updated on: Aug 05, 2019 | 10:43 AM

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहने ग्लोबल टी 20 क्रिकेट स्पर्धेत 22 चेंडूंमध्ये 51 धावा ठोकल्या. त्याच्या या शानदार खेळीला तीन चौकार आणि पाच षटकारांचा साज होता

सिक्सर किंगचा जलवा कायम, ग्लोबल टी20 मध्ये पाच षटकारांसह 22 चेंडूत 51 धावा
Follow us on

टोरंटो : ‘सिक्सर किंग’ अशी बिरुदावली मिरवणारा भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी त्याचा जलवा कायम असल्याचं दिसत आहे. ग्लोबल टी20 कॅनडामध्ये युवीने चमकदार कामगिरी केली. पाच षटकारांचा साज चढवत युवराजने 22 चेंडूत तब्बल 51 धावा ठोकल्या.

‘टोरंटो रॉयल्स’ संघाचा कर्णधार असलेल्या युवराजने 22 चेंडूंमध्ये 51 धावा रचल्या. दुर्दैवाने युवराजची ही अर्धशतकी व्यर्थ गेली. कारण ‘ब्रॅप्टन वूल्व्ज’कडून टोरंटो रॉयल्स संघाला पराभव स्वीकारावा लागला.

ग्लोबल टी20 कॅनडामध्ये झालेल्या या सामन्यात ‘ब्रॅप्टन वूल्व्ज’ने सहा गडी गमावून 222 धावांचा डोंगर उभारला होता. मॅक्युलमने 36 धावांची खेळी करत चांगली सुरुवात केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या युवराजनेही मैदानात उतरताच धमाका केला. तीन चौकार आणि पाच षटकार ठोकत युवराजने या टूर्नामेंटमधलं आपलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं.

युवराज 16 व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर टोरंटो रॉयल्सनी 211 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे ‘टोरंटो रॉयल्स’ संघाचं विजयाचं स्वप्न 11 धावांनी भंगलं.

आपल्या आयपीएल संघाचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेचा आनंदी चेहरा पाहून समाधान वाटल्याच्या भावना युवराजने व्यक्त केल्या. ‘ब्रॅप्टन वूल्व्ज’ संघाचा कर्णधार आणि न्यूझीलंडचा ओपनर कॉलिन मुन्रोनेही युवराजची तारीफ केली. युवराजची फलंदाजी पाहून मजा आली. त्याने धमाकेदार फटकेबाजी केली, अशा शब्दात मुन्रोने कौतुक केलं.

युवराज सिंहने 10 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीची घोषणा केली होती. युवराज सिंह भारतीय संघात शेवटचा 2017 मध्ये दिसला होता. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. मात्र, आयपीएलमध्ये केवळ त्याला चार सामन्यातच खेळता आलं होतं.

बीसीसीआयच्या नियमानुसार, भारतीय खेळाडू निवृत्तीनंतरच परदेशी लीगमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे त्याला भारतात निवृत्ती स्वीकारणं अनिवार्य होतं.

 

युवराज सिंहची क्रिकेट कारकीर्द

भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅन्सरचं निदान होऊनही युवराज सिंह ढाण्या वाघासारखा लढला होता.

युवराज सिंहने भारताकडून 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय युवराजने 40 कसोटी सामन्यात 1900 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी 20 स्पेशालिस्ट युवराजने 58 सामन्यात 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत.

धोनीच्या टीम इंडियाने 2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक जिंकला. तेव्हा युवराजची कामगिरी मोलाची ठरली होती. याच विश्वचषकात युवीने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकण्याचा ऐतिहासिक पराक्रम गाजवला होता. एकाच षटकात वसूल केलेल्या 36 धावांनी युवराजने अवघ्या 12 चेंडूंमध्येच अर्धशतक साजरं करून दिलं.

19 सप्टेंबर 2007 रोजी ट्वेन्टी ट्वेन्टीच्या पहिल्या विश्वचषकातला भारत वि. इंग्लंड हा सामना दक्षिण आफ्रिकेतल्या डरबनच्या किंग्समीडवर खेळवण्यात आला होता.