अनेक राज्यांना जमलं नाही ते या गावाने करून दाखवलं, थेट जगाला दिला मोठा संदेश, आनंद महिंद्रा यांनीही केलं कौतुक

भल्या भल्या राज्यांना करता आलं नाही ते या गावाने करून दाखवलं. ना त्यांना कोणी सांगितलं. एकत्र आल्यावर काय होतं ते या गावाकडून शिकावे. भारतातील एकमेव गाव ज्याने जगाला सांगितलं स्वच्छतेचं महत्व.

अनेक राज्यांना जमलं नाही ते या गावाने करून दाखवलं, थेट जगाला दिला मोठा संदेश, आनंद महिंद्रा यांनीही केलं कौतुक
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 02, 2026 | 4:36 PM

Asia Cleanest Village: जेव्हा स्वच्छतेसाठी संपूर्ण समुदाय एकत्र येतो तेव्हा चमत्कार घडतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मेघालयातील मावलिनॉन्ग हे गाव. ‘आशियातील सर्वात स्वच्छ गाव’ म्हणून ओळख मिळवलेल्या या छोट्याशा गावाची चर्चा आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही केली आहे. त्यांच्या मते, मावलिनॉन्ग हे केवळ एक गाव नसून संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान आहे.

मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात वसलेले मावलिनॉन्ग हे घनदाट जंगल आणि निसर्गरम्य वातावरणाने वेढलेले आहे. स्वच्छता आणि शिस्त यासाठी हे गाव जगभरात प्रसिद्ध आहे. येथे रस्ते स्वच्छ आहेत, बांबूच्या कचरापेट्या सर्वत्र ठेवण्यात आल्या आहेत आणि प्रत्येक घराबाहेर हिरवळ सजवलेली दिसते. स्वच्छता येथे केवळ दिखावा नसून जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे.

आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया

आनंद महिंद्रा यांनी या गावाचे कौतुक करताना ‘It takes a village to raise a child’ ही म्हण शेअर केली. त्यांचा अर्थ असा की जबाबदारी ही एका व्यक्तीची नसून संपूर्ण समुदायाची असते. मावलिनॉन्गमध्ये हीच भावना दैनंदिन जीवनात दिसून येते. येथे स्वच्छता ही सरकारी मोहीम नसून लोकांची सवय आणि संस्कृती बनली आहे.

या गावात प्रत्येक घरात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. प्लास्टिकचा वापर अत्यंत कमी आहे आणि सेंद्रिय कचऱ्यापासून खत तयार केले जाते. गावकरी कचरा व्यवस्थापनाला सामूहिक जबाबदारी मानतात. त्यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसतो.

देशासाठी प्रेरणा

मावलिनॉन्गमधील जीवनशैली शहरांच्या तुलनेत अधिक शांत आणि समाधानकारक मानली जाते. ताजी हवा, निसर्गाच्या सान्निध्यातील जीवन आणि मजबूत सामाजिक नाती यामुळे हे गाव वेगळे ठरते. येथे लोक एकत्र काम करतात. सण साजरे करतात आणि परस्परांना सहकार्य करतात. ही सामूहिक भावना गावाची खरी ओळख आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी सुचवले की, संपूर्ण भारताने ईशान्येकडील राज्यांकडून स्वच्छता आणि शिस्त शिकावी. मावलिनॉन्ग हे दाखवून देते की बदल घोषणा देऊन नाही तर सवयी बदलून होतो. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घराची आणि परिसराची जबाबदारी घेतली तर देशाची प्रतिमा आपोआप बदलू शकते.

Follow Us