TRAI New Rules : नाही चालणार मार्केटिंगवाले अन् त्यांचे फंडे! 1 मेपासून ग्राहकांची डोकेदुखी कमी होणार

| Updated on: Apr 30, 2023 | 10:13 AM

TRAI New Rules : 1 मेपासून गॅस सिलेंडरचे भाव, बँकांचे नियम आणि अनेक बाबतीत बदल होतो. पण एक महत्वाचा बदल पण होत आहे.

TRAI New Rules : नाही चालणार मार्केटिंगवाले अन् त्यांचे फंडे! 1 मेपासून ग्राहकांची डोकेदुखी कमी होणार
घ्या मोकळा श्वास
Follow us on

नवी दिल्ली : 1 मेपासून गॅस सिलेंडरचे भाव, बँकांचे नियम आणि अनेक बाबतीत बदल होतो. पण एक महत्वाचा बदल पण होत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) कोट्यवधी भारतीयांच्या जीवनावर प्रभाव टाकणारा हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना दररोज सतावणाऱ्या नकोशा कॉलची चिंता वाहण्याची गरज नाही. मोबाईल कंपन्यांना याविषयीचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे या बोगस टेलिमार्केटिंग कंपन्यांपासून (Telemarketing Companies) कोट्यवधी भारतीयांची सूटका तर होणारच आहे. पण त्यांची फसवणूक पण टळणार आहे. कृत्रिम बुद्धीमतेचा (Artificial Intelligence-AI) वापर करुन नकोशा कॉलला (Unwanted Calls) अटकाव करण्यात येणार आहे.

1 मेपासून बोगस कॉल, मॅसेज बंद
या 1 मेपासून ग्राहकांना खरा बदलाचा फायदा दिसून येईल. त्यांना नकोशा कॉलचा प्रचंड त्रास आहे. काही ग्राहकांना तर या कॉलचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता ट्रायच्या धोरणानुसार, मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या त्वरीत एआय फिल्टरचा वापर करुन टेलिमार्केटिंग कंपन्यांचे कॉल नेटवर्कवरच अडवतील. त्यांची पडताळणी होईल. त्यामुळे ग्राहकांना दररोज होणारा मनस्ताप कमी होईल.

10 अंकी मोबाईल क्रमांक बंद
आता जाहिरातीसाठी, मार्केटिंगसाठी सर्वच जण वापरतात तसा 10 अंकी मोबाईल क्रमांक वापरता येणार नाही. टेलिमार्केटिंग कंपन्यांना 12 अंकी मोबाईल क्रमांक टेलिकॉम ऑपरेटर्सकडून घ्यावे लागतील. या खास क्रमांकावरुनच त्यांना ग्राहकांना कॉल करता येईल. तसेच त्यांना वारंवार कॉल करता येणार नाही. त्यासाठी पण नियम आहेत. 12 अंकी मोबाईल क्रमांकावरुन आलेला कॉल ग्राहकांना त्वरीत ओळखता येईल.

हे सुद्धा वाचा

असा ओढला लगाम
या नवीन नियमांमुळे ग्राहकांची आपोआप सूटका तर होईलच. पण टेलिमार्केटिंग कंपन्यांना जोरदार फटका बसेल. तसेच त्यांना आता नियम पाळवे लागतील. सर्वसामान्य क्रमांकावरुन या कंपन्या ग्राहकांना नाहक त्रास देत होत्या. 200-300 सिम कार्ड खरेदी करुन ग्राहकांना विविध कंपन्यांच्या ऑफरच्या नावाखाली गंडविण्यात येत होते. बँक क्रेडिट कार्ड, कर्ज, विविध आकर्षक योजनांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्यात येत होती. ती टळणार आहे. टेलिमार्केटिंग कंपन्यांना आता नियमात राहून त्यांच्या प्रोमोशनसाठी एक खास मोबाईल क्रमांक घ्यावा लागणार आहे.

बंद होईल दुकानदारी
दूरसंचार विभागाने यासाठी मोबाईल कंपन्यांना एआय आधारित स्पॅम फिल्टर बसविण्याचे निर्देश दिले आहेत. या फिल्टरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे 1 मे नंतर ग्राहकांना दिलासा मिळेल. नेटवर्क पातळीवरच नको असलेले कॉल्स ब्लॉक होतील. सर्वसामान्यांच्या मोबाईलवर असे कॉल्स येणार नाहीत. तर स्पॅम एसएमएसविषयी पण असेच धोरण राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खास यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. फसवणूक करणाऱ्या लिंक्सचा वापर करणारे एसएमएस पण नेटवर्क पातळीवरच ब्लॉक होतील. ते ग्राहकांपर्यंत पोहचणारच नाहीत.