Maharashtra Farmers : अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा, दिवाळीआधीच…
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचाही समावेश आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ओल्या दुष्काळाबाबत निर्णय घेतील.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेत पीकं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बळीराज्यावर संकंट ओढावलं आहे. मात्र मुसळधार पावसानं शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार भरपाई देईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील.
भरणे यांनी सांगितले की, नदीकाठच्या जमिनीची माती वाहून गेल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न असेल आणि शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील. दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेल याबाबत त्यांनी आश्वस्त केले आहे.

