India Pakistan War : गरज पडल्यास आपात्कालीन… केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र, नेमकं काय म्हटलं?
गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्यास सांगितले आहे
गृह मंत्रालयाकडून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना एक पत्र लिहीले आहे. या पत्राद्वारे त्यांना मोठा आणि महत्त्वाचा आदेश दिल्याचे पाहायला मिळतंय. गरज पडल्यास आपात्कालीन साम्रगी खरेदी करा, असं केंद्र सरकारकडून देशातील सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना म्हटलंय. यासह आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करा, असेही पत्राद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी भारताच्या पाकिस्तान सीमेवरील आणि देशातील विमानतळांवर सद्यस्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गृह मंत्रालयाच्या पत्रात नागरी संरक्षण नियम, १९६८ च्या कलम ११ अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याअंतर्गत, राज्य सरकारांना आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे आणि मालमत्तेचे नुकसान किंवा नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचा अधिकार मिळतो.