AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Fadnavis : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीसांचा दिल्ली दौरा, केंद्राकडे केली मोठी मागणी

CM Fadnavis : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीसांचा दिल्ली दौरा, केंद्राकडे केली मोठी मागणी

| Updated on: Sep 26, 2025 | 4:31 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा करत महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे वाढीव मदतीची मागणी केली आहे. मराठवाड्यासह राज्यातील ३१ हून अधिक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने एसडीआरएफमधून २२१५ कोटींचा निधी दिला असला तरी, एनडीआरएफमधून भरीव मदतीची आवश्यकता असल्याचे अमित शहा यांना कळवले आहे.

महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर, राज्याला केंद्राकडून वाढीव मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला. केंद्रीय कृषिमंत्र्यांसोबत त्यांची बैठक झाल्याची शक्यता आहे. तसेच, राज्याचा केंद्राला वाढीव मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्राची एक समिती लवकरच राज्यात येऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून एनडीआरएफ (National Disaster Response Fund) मधून अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. राज्याने एसडीआरएफ (State Disaster Response Fund) निधीतून २२१५ कोटी रुपयांचा निधी जारी केला असला तरी, हेक्टरी ८५०० रुपये मदत अपुरी असल्याचे बोलले जात आहे. पंजाब सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये मदत दिली असल्याने, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडूनही ५०,००० रुपये प्रति हेक्टर मदतीची मागणी जोर धरू लागली आहे.

Published on: Sep 26, 2025 04:31 PM