वर्षभरात 75 हजार तरुणांना नोकऱ्या, फडणवीस म्हणाले, कृपया ‘ही’ गोष्ट करू नका!

| Updated on: Nov 03, 2022 | 1:40 PM

महाराष्ट्र सरकारतर्फे आज दोन हजार तरुणांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.

Follow us on

मुंबईः राज्य सरकारतर्फे लवकरच 75 हजार तरुणांना (Government Jobs)रोजगार दिला जाणार आहे. याची सुरुवात आज झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra FAdanvis) यांच्या उपस्थितीत आज पहिला कार्यक्रम झाला. आज दोन हजार तरुणांना नोकऱ्यांची घोषणा करण्यात आली. यावेली देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना विनंती केली.

ते म्हणाले, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. मात्र अनेक आरक्षणं असल्यामुळे ही प्रक्रिया किचकट असते. कृपया तरुणांनी कोर्टात केस करून भरती प्रक्रिया रद्द करू नका. आम्हीदेखील चुका करणे टाळण्याचा प्रयत्न करू…’

मुंबईत आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणीवस बोलत होते. ते म्हणाले, ‘ ‘ नोकरी भरतीची ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने झाली पाहिजे, असे प्रयत्न आहेत. त्यामुळे अनेक पदं एमपीएससीला दिलेत. विभागातर्फे ही पदं भरताना एक अमूलाग्र बदल केलाय. मागील सरकारमध्ये जे घोटाळे, यात पहायला मिळाले, तरुणांच्या मनात शंका निर्माण झाली.

‘टीसीएससारखी उत्तम एजन्सी आणि बँकांची परीक्षा घेणारी केंद्र सरकारची एजन्सी आहे. त्यांच्यामार्फत नॉमिनेशन पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच या परीक्षा सुरु करत आहोत.

वर्षभरात 75 हजार परीक्षा आटोपून ही नियुक्ती करायची आहे. 14 ते 19 च्या काळात ही भरती करायची होती. पण अनेक अडथळे आले. कोर्टकचेरी झाली. अनेकदा शासनाच्या नोकऱ्यांमध्ये विविध आरक्षण असतात. याचा आधी योग्य प्रकारे विचार झाली नाही तर कोर्ट केस होतात. मुलांना अनेक वर्ष ताटकळत बसावं लागतं.

त्यामुळे विद्यार्थी आणि तरुणाईला सांगू इच्छितो की, जीवनातली शेवटची अटेंप्ट आहे, असं समजू नका. कृपया छोट्या गोष्टीसाठी कोर्टात जाऊ नका. यामुळे अनेकांचं नुकसान होतं. पुढच्या भरतीवरही परिणाम होतो. आम्हीही चुका टाळण्याचा प्रयत्न करू…