जमिन वनविभागाची, दहा वर्ष मलिदा दुसऱ्यांनीच खाल्ला; विरोध अन् पोलीसांची महिलांशी झटापट
येथील कळंब तालुक्यातील नरसापूर वन क्षेत्रातील अतिक्रमण हटविताना वनविभागाचे पथक व अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचे समोर आले आहे.
यवतमाळ : सध्या राज्यातील अनेक वन क्षेत्रातील जमिनींवर अतिक्रमण झाल्याचे समोर येत आहे. ते अतिक्रमण हटविण्याचे काम वनविभागाकडून केलं जात आहे. काही ठिकाणी हा वाद सामोपचारानं निकाली निघत आहे. तर काही ठिकाणी पोलिसी बळाचा वापर करावा लागत आहत. यामुळे वादावादीचे प्रकार घडताना दिसत आहेत. येथील कळंब तालुक्यातील नरसापूर वन क्षेत्रातील अतिक्रमण हटविताना वनविभागाचे पथक व अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून या 25 हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण करून त्याठिकाणी शेती केल्या जात होती. अतिक्रमण हटविण्यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही शेती केल्या जात होत्या. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली. यावेळी कारवाईला विरोध करण्यासाठी काही महिला पुढे आल्या आणि जोरदार झटापट झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.