Jarange Patil : ‘तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद करायची अन्..’, नव्या सरकारचा शपथविधी होताच जरांगे पेटले
महायुतीच्या शपथविधीवरून अनेक विरोधकांच्या प्रतिक्रिया येत असताना आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाष्य करत महायुती सरकारला थेट इशारा दिला आहे.
काल नुकताच महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीवरून अनेक विरोधकांच्या प्रतिक्रिया येत असताना आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाष्य करत महायुती सरकारला थेट इशारा दिला आहे. ‘देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कायद्याप्रमाणे शपथ घेतली, तिघांना शुभेच्छा देतो. आमच्याकडून तिघांचं अभिनंदन, पण आता नाटकबाजी बंद करायची अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची’, असं म्हणत शुभेच्छा देत मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशाराच दिल्याचे पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले, आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू, समाजाला सांभाळायला शिका, जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे. तुम्ही जनतेचं मन जिंकण्याचं काम करा, असं म्हणत असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट आहे. लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, समाज तुमचं अभिनंदन करेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.