महापालिका निवडणुकीत मनसेला सुगीचे दिवस येणार? काय म्हणाले अविनाश जाधव
आगामी महापालिका निवडणुकांवर ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलं भाष्य, म्हणाले ठाण्यातील मनसे स्ट्राँग...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर असून ठाण्यातील जैन समाजाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असणार आहेत. यावेळी ते जैन समाजाची भेटदेखील घेणार आहेत. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ठाण्यातील आनंद टोलनाका येथे उपस्थित झाले आहेत. यासह आनंद नगरवरून राज ठाकरेंच्या उपस्थितीत बाईक रॅली देखील निघणार आहे.
या कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तर आगामी महापालिका निवडणुका पाहता हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. राज ठाकरेंच्या आदेशानुसार आमच्या बैठका सुरू आहेत. महापालिका निवडणुकांलक्षात घेता मनसेला सुगीचे दिवस येणार का? यावर बोलताना अविनाश जाधव म्हणाले, महापालिकेत आम्ही ताकद जरी नसली तरी उर्वरित शहरात मनसे इतकी ताकद कोणाची नाही. सगळ्या पक्षांपेक्षा मनसेचं मनुष्यबळ हे ठाण्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे आताच्या महापालिका निवडणुकीत ठाण्यातील मनसे स्ट्राँग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
समविचारी पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती गोष्ट चांगली असते. जर त्यांना आमच्या साथीची गरज असेल तर आम्हालाही गरज आहे. आम्ही सोबत राहून काम करू. चांगल्या गोष्टीची सुरूवात ही विकासाच्या दृष्टीने जाते. राज ठाकरे हे विकासाचा ग्लोबल विचार करत असतात आणि आताचे सरकार हे विकासाचे कामं करत आहे, त्यामुळे असे दोन विचार एकत्र झाले तर प्रगतीचा वेग हा वाढेल, असे अविनाश जाधव म्हणाले.