पहिल्या पावसातच एसटीबसची पोलखोल; छत असूनही प्रवाशांना घ्यावी लागते छत्री
गेल्या 24 तासात अनेक जिल्ह्यात पाऊस होत आहे. याचे समाधान सध्या शेतकरी वर्गासह घामाच्या धारा वाहणाऱ्या मुंबईकरांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे मात्र पहिल्याच पावसात पालघरच्या एसटी आगारातील लाल परिंची पोलखोल झाली आहे.
पालघर : एकीकडे राज्यातला बळीराजा आणि नागरिकही पावसाची आतूरतेने वाट पाहत असतानाच आता पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात अनेक जिल्ह्यात पाऊस होत आहे. याचे समाधान सध्या शेतकरी वर्गासह घामाच्या धारा वाहणाऱ्या मुंबईकरांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे मात्र पहिल्याच पावसात पालघरच्या एसटी आगारातील लाल परिंची पोलखोल झाली आहे. येथे पहिल्याच पावसात लाल परिला गळती लागल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे पालघरच्या सफाळे आगारातील लाल परितून प्रवास करताना प्रवाशांचे हाल होत आहेत. तर हे सर्व फक्त एसटी महामंडळाच्या गळथान कारभारामुळे होत असल्याची टीका प्रवाशांमधून होत आहे. तर बसच्या छताला गळती लागल्याने प्रवाशांना डोक्यावर छत्री घेऊन प्रवास करावा लागत आहे.

