AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल

UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल

| Updated on: Aug 01, 2026 | 11:47 AM
Share

UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद अद्यापही कायम असून, परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतरही विरोधकांनी सरकारवर टीकेची धार कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परीक्षा सुधारणा विधेयकावर नाराजी व्यक्त करत नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद अद्यापही कायम असून, परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतरही विरोधकांनी सरकारवर टीकेची धार कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परीक्षा सुधारणा विधेयकावर नाराजी व्यक्त करत नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबईत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “देशात UPSC परीक्षेचा पेपर कधी फुटत नाही, मग NEET चाच पेपर वारंवार कसा फुटतो?” असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT), सर्वपक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.

सुळे यांनी पुढे शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिकीकरणावरही टीका केली. काही कोचिंग क्लासेस मोठ्या आर्थिक उलाढाली करत असून, त्यांच्या कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध होत आहेत, हे चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले. “शिक्षणाचे बाजारीकरण थांबले पाहिजे. संसदेत शिक्षण व्यवस्थेवर गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.

परीक्षा सुधारणा विधेयकाबाबतही त्यांनी असमाधान व्यक्त केले. “या विधेयकावर मी समाधानी नाही, राष्ट्रवादी काँग्रेस समाधानी नाही आणि इंडिया आघाडीही समाधानी नाही. एका पालकाच्या भूमिकेतूनही मी समाधानी नाही. केवळ शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही, तर पेपरफुटीची मूळ कारणे रोखली पाहिजेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत सुळे म्हणाल्या की, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता तर परिस्थिती वेगळी राहिली असती. “विद्यार्थ्यांवर अश्रुधूराचा वापर करण्यात आला, त्याचे आवाज संसदेतही ऐकू येत होते. सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने तोडगा काढावा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, NEET पेपरफुटी प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळून देशातील परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

Published on: Aug 01, 2026 11:47 AM

Follow Us