Kharif : पेरणीची घाई..संकटात नेई, खरीप महिनाभर लांबणीवर..! काय आहेत कृषी विभागाच्या सूचना?

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे त्याचे योग्य नियोजन झाले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. मराठवाडा, विदर्भात या हंगामात सोयाबीनसह कापशीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांच्या पेऱ्यात उशीर झाला तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. पण प्रमाणापेक्षा जमिनीत ओल नसल्यास शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

Kharif : पेरणीची घाई..संकटात नेई, खरीप महिनाभर लांबणीवर..! काय आहेत कृषी विभागाच्या सूचना?
खरीप हंगाम
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 16, 2022 | 12:14 PM

यवतमाळ : यंदा पावसाचे आगमन वेळेपूर्वी होणार म्हणून शेतकऱ्यांनी (Pre-kharif cultivation) खरीपपूर्व मशागतीची कामे आटोपून घेतली होते. सर्वकाही वेळेनुसार झाल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि खताची देखील खरेदी केली. मात्र, ज्याच्यावर संपूर्ण  (Kharif Season) खरीप हंगाम अवलंबून आहे तो मान्सूनच अजून सक्रीय झालेला नाही. त्यामुळे केवळ शेती क्षेत्राशी निगडीत असणारेच चिंतेत असे नाही तर सर्वच बाबींवर त्याचा परिणाम झाला आहे. (Maharashtra) राज्यात 146. 85 लाख हेक्टरावर पेरणीचे नियोजन झाले असले तरी अजून प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली असे नाही. तर पावसाच्या अनिश्चितीमुळे 15 जुलैपर्यंत पेरणी केली तरी उत्पादनात घट होणार नाही. शेतकऱ्यांनी घाईत निर्णय घेऊ नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

उत्पादनाच्या दृष्टीने खरीप महत्वाचा

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे त्याचे योग्य नियोजन झाले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. मराठवाडा, विदर्भात या हंगामात सोयाबीनसह कापशीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांच्या पेऱ्यात उशीर झाला तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. पण प्रमाणापेक्षा जमिनीत ओल नसल्यास शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याने कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. त्याच बरोबर कमी कालावधीत अधिकच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा पेराही वाढणार असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.

काय आहे कृषी विभागाचे आवाहन ?

खरीप हंगामाच्या अनुशंगाने प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी तयारी झाली आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने आता पेरणी म्हणजे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावणार आहे. यवतमाळसह उर्वरीत भागात 22 जूननंतरच पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 22 जूननंतरच चाढ्यावर मूठ ठेवली तर ते फायद्याचे राहणार आहे. शिवाय खरिपाची पेरणी ही 15 जुलैपर्यंत केली तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचे अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी सांगितले आहे.

गतवर्षी नुकसान, यंदा पेरण्या लांबणीवर

यंदा वेळेत पाऊस झाला असता तरी शेतकऱ्यांना गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्याची संधी मिळाली असती. उशीरा पेरण्या झाल्या तरी सोयाबीनच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही पण कापूस, तूर, मूग या पिकाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीन वाणाचा वापर हा यंदा फायद्याचा राहणार आहे. सध्याच्या काळ पेरणीसाठी योग्य होता पण पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांना वाट पहावीच लागणार आहे. गतवर्षीचे नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us