अवकाळी पावसाने पिके आणि फळबागा धोक्यात, औषध फवारणीचा खर्च वाढणार

हिंगोली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये रात्री अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे संत्रा,आंबा ह्या फळबागेचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने पिके आणि फळबागा धोक्यात, औषध फवारणीचा खर्च वाढणार
Crop Insurance Company
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 16, 2023 | 2:31 PM

अहमदनगर : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील अनेक भागात कालपासूनच ढगाळ वातावरण आहे. काल दुपारच्या सुमारास काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काढणीला आलेली पिके धोक्यात येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची (Farmer) चिंता वाढलीय. अनेक पिकांना तसेच फळबागांना रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये रात्री अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे संत्रा,आंबा ह्या फळबागेचे नुकसान झाले आहे. उभा असलेल्या गहू, हरबऱ्यासह इतर पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतातूर झाला आहे.

शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पूर्णपणे वाया जाण्याची भीती

नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वादळ वारा विजेच्या कडकडात सह पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, तळोदा, धडगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेले, मका, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान होणार आहेत तर फळबागातील पपया आणि केळीच्या देखील मोठ्या नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन मिळवण्यासाठी संपावर गेले असल्याने याच्या फटका अवकाळी पावसात फटका बसलेल्या शेतकऱ्यांवर होणार आहे. अवकाळी पाऊस एका आठवड्यात आज तिसऱ्यांदा पाऊस झाला आहे. त्यामुळे संपावर गेले असलेल्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे होणार नाही. शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कशी होणार असाच काहीसा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे, तर दुसरीकडे आसमानी संकटापासून शेतकरी सामोरे जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यासमोरील आव्हान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात शेतकऱ्याने मदत केली तर काहीसा दिलासा मिळेल अशीच अपेक्षा आता शेतकरी करत आहेत.