Nagpur : आता नुकसानीच्या खुणा, पिकांसह शेतजमिनीही खरडल्या, कृषी विभागाचा धक्कादायक अहवाल

| Updated on: Jul 26, 2022 | 5:05 PM

जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेला पाऊस हा नुकसानीचा ठरलेला आहे. यामुळे खरिपातील काही क्षेत्रावरील पेरण्या तर रखडल्या पण पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकेही वाहून गेली आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामध्ये झाले आहे. राज्यातील तब्बल 9 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवालच कृषी विभागाने सादर केला आहे.

Nagpur : आता नुकसानीच्या खुणा, पिकांसह शेतजमिनीही खरडल्या, कृषी विभागाचा धक्कादायक अहवाल
अतिवृष्टी आणि सततच्या पावासामुळे नागपूर विभागातील 2 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नागपूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. महिनाभर पावसाने हाहाकार केल्याने (Crop Damage) शेती पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण शेत जमिनही खरडून गेल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. (Agricultural Department) कृषी विभागाच्या हवाल्यानुसार (Nagpur Division) नागपूर विभागातील तब्बल 2 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे तर 350 हेक्टर शेतजमिन ही पिकांसह वाहून गेली आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाजही काढता येईना अशी स्थिती झाली आहे. हंगामाच्या सुरवातीलाच न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे आणि पीक पाहणीची औपचारिकता न करता थेट शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षातील नेतेमंडळी करीत आहे.

सर्वाधिक फटका विदर्भाला..!

जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेला पाऊस हा नुकसानीचा ठरलेला आहे. यामुळे खरिपातील काही क्षेत्रावरील पेरण्या तर रखडल्या पण पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकेही वाहून गेली आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामध्ये झाले आहे. राज्यातील तब्बल 9 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवालच कृषी विभागाने सादर केला आहे. शिवाय अजूनही पावसामध्ये सातत्य आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात 2 लाख हेक्टर वरील पिकांची नासाडी झाली आहे तर 350 हेक्टर वरील शेतातील सुपीक जमीन पिकांसह पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

पंचनाम्यासाठी प्रशासकीय अधिकारी बांधावर

पावसाने नुकसानीचे स्वरुप पाहता सरकारने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागातील अधिकाऱ्यांसह महसूलचे कर्मचारीही बांधावर पोहचले आहेत. विदर्भात भात पिकाचे आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची पाहणी करुन पंचनामे केले जात आहेत. नुकसानभरपाईबाबत कोणतेही निकष बदलले गेले नसल्याने 2015 प्रमाणेच हेक्टरी 6 हजार 800 रुपये मदत मिळणार का ते देखील पहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

नुकसानीचा अहवाल शासनाकडे

सध्या विदर्भात पीक पाहणी आणि पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हा प्राथमिक अंदाज असून यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. आतापर्यंत 2 लाख हेक्टरावरील पिकांच्या नुकसानीचा अहवाल आहे तर 350 हेक्टरावरील जमिनही वाहून गेली आहे. त्यामुळे हा संपूर्ण अहवाल पूर्ण झाला सरकारकडे सपूर्द केला जाणार असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी सांगितले आहे.