Pomegranate : मुख्य आगारातून डाळिंब बागा नामशेष होण्याच्या मार्गावर, काय आहेत कारणे?

| Updated on: Jan 24, 2022 | 12:22 PM

उत्पादन वाढीसाठी जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुक्याला डाळिंब बागेचा सर्वोत्तम पर्याय मिळाला होता. यामधून देशभरात या तालुक्याची ओळख ही डाळिंबाचा तालुका म्हणून झाली होती पण आता डाळिंबाच्या बागा झपाट्याने छाटल्या जात आहेत. गेल्या तीन वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा आणि रोगराई व किडीमुळे या तालुक्यातील बागांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

Pomegranate : मुख्य आगारातून डाळिंब बागा नामशेष होण्याच्या मार्गावर, काय आहेत कारणे?
वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागेवर परिणाम झााल आहे, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
Follow us on

सोलापूर : उत्पादन वाढीसाठी जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुक्याला (Pomegranate production) डाळिंब बागेचा सर्वोत्तम पर्याय मिळाला होता. यामधून देशभरात या तालुक्याची ओळख ही डाळिंबाचा तालुका म्हणून झाली होती पण आता डाळिंबाच्या बागा झपाट्याने छाटल्या जात आहेत. गेल्या तीन वर्षापासून ( impact of environment) निसर्गाचा लहरीपणा आणि रोगराई व किडीमुळे या तालुक्यातील बागांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तालुक्यात 35 हजार हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावर डाळिंब बागा होत्या आता केवळ 7 हजार हेक्टरावरील बागा शिल्लक राहिलेल्या आहेत. डाळिंब बागेतून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती तर झाली पण वातावरणातील बदल आणि रोगराईचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना वेगळा पर्याय शोधावा लागत आहे. दर्जेदार डाळिंबामुळे (Sangola) सांगोला तालुक्याची ओळख सबंध देशभर झाली होती आता येथील शेतकरी वेगळा पर्याय शोधण्याच्या तयारीत आहेत.

कशामुळे बदलले चित्र?

पोषक वातावरण आणि दर्जेदार उत्पादनामुळे अल्पावधीच सांगोल्याची डाळिंबे ही सातासमुद्रापार गेली होती. शिवाय येथील अत्यल्प पर्जन्यमान, उष्ण हवामान व डाळिंबासाठी पोषक वातावरण यामुळे तब्बल 35 हजार हेक्टरावर डाळिंबाच्या बागा बहरत होत्या. मात्र, वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका डाळिंब बागांना बसलेला आहे. डाळिंबावर तेल्या रोग त्यानंतर मर आणि आता नव्यानेच बोरर या खोडकिडीचे आक्रमण यामुळे बागा जोपासणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. खोडकिडीने संपूर्ण झाडच वाळून जात आहे तर तेल्या रोगावर अद्यापही योग्य औषध उपलब्ध झालेले नाही. हीच कारणे आहेत डाळिंब बागेच्या तोडणीची. त्यामुळे शेतकरी नव्या पर्यायाचा शोध घेत आहेत.

उपाययोजनांबाबत संशोधन केंद्राची अनास्था

डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनामुळे सांगोला तालुक्याची वेगळी अशी ओळख निर्माण झाली होती. शिवाय गेल्या 2 दशकांपासून शेतकऱ्यांचे अथक परिश्रम आणि सातत्या यामुळे हे शक्य झाले होते. मात्र, कीडीचा प्रादुर्भाव अन् वातावरणातील बदल या दरम्यान, डाळिंब संशोधन केंद्राककडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही. गेल्या तीन वर्षापासून बागांचे क्षेत्र हे घटत असतानाही योग्य ते मार्गदर्शन झाले नसल्यानेच ही वेळ आली आहे. त्यामुळे आता नामशेष होण्याअगोदर वेगळा उपक्रम राबवूनच ही धोक्याची घंटा टाळता येणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

कृषी विभागाची दुजोरा

तालुक्यात यंदा डाळिबं बागा जोपासण्यापेक्षा त्या काढून टाकण्यावरच शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. तालुका कृषी कार्यालयाकडे 24 हजार हेक्टरावर डाळिंब बाग असल्याची नोंद आहे. पण काढून टाकलेल्या बागांची अद्यापपर्यंत नोंद झालेली नाही. अशक्त झाडांवर कीड-रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. शिवाय तेल्या रोगाचा बंदोबस्त कसा करावा याबाबत अद्यापही योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने हे नुकसान होत असल्याचे तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

निसर्गाचा लहरीपणा कायम : बदलत्या वातावरणाचा परिणाम आता थेट रब्बीच्या उत्पादनावरच

राज्यस्तरीय हळद परिषदेत कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी महत्वपूर्ण सल्ला, वाचा सविस्तर

Rabi Season : खरिपापाठोपाठ रब्बीचेही स्वप्न भंगले, शेतकऱ्याने हरभरा पीकच उपटून बांधावर फेकले