आधी कोरोनाचा मार, आता यवतमाळमध्ये ‘या’ रोगांचा पिकांवर हल्ला, शेतकरी हवालदील

| Updated on: Aug 08, 2021 | 3:41 PM

पीक वाढत असतानाच यंदाही पिकावर बोंडअळी, मावा, तुडतुडा आदी कीड प्रकारांनी आक्रमण केले आहे. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्यानं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

आधी कोरोनाचा मार, आता यवतमाळमध्ये या रोगांचा पिकांवर हल्ला, शेतकरी हवालदील
Follow us on

यवतमाळ : गेल्या वर्षी बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. सोयाबीनलाही खोडअळी आल्यानं दुबार पेरणी करावी लागली. यातून सावरून शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने कपाशी, सोयाबीन पिकाची लागवड केली. मात्र, पीक वाढत असतानाच यंदाही पिकावर बोंडअळी, मावा, तुडतुडा आदी कीड प्रकारांनी आक्रमण केले आहे. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्यानं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

खरीपाच्या पिकावर शेतकऱ्यांची मदार

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांची संपूर्ण मदार खरीप हंगामातील पिकांवर असते. यावर्षी साडेचार लाख हेक्टरवर कपाशी, तर 1 लाख 80 हजार हेक्टरवर सोयाबीन लागवड करण्यात आली. काही वर्षांपासून खरीप हंगाम शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारा ठरत आहे. यंदाही शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होत पिकांची लागवड केली. पिकांची वाढ होत असतानाच पिकांवर किडीने आक्रमण केले. यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत. मात्र, त्याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही.

बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाते. कृषी केंद्र चालक आपल्याच मर्जीप्रमाणे शेतकर्‍यांना औषधी देतात. त्याचाही फटका शेतकर्‍यांना बसत आहे. या संकटात शेतकरी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून मार्गदर्शन मागत आहे. परंतु, कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. मागील वर्षी बोंडअळीमुळे नुकसानीची मदत मिळाली नाही. त्यामुळे आत्महत्या करायची का, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहे.

कृषी विभागाकडून प्रतिसाद अल्प

मागील वर्षी बोंडअळीने कपाशीचे अतोनात नुकसान केले. यंदाही तीच परिस्थिती दिसत आहे. मावा, तुडतुडाने आक्रमण केले आहे. कृषी विभागाचे अधिकारी बांधावर येऊन पाहणी करीत नाही. फवारणी करूनही फायदा होत नसल्याने नवीनच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अनुप चव्हाण या शेतकऱ्यांकडे 15 एकर शेती आहे. 7 एकरात कपाशी व 8 एकरात सोयाबीन लागवड केली आहे. मावा, तुडतुडा, पांढर्‍या माशीपासून पिकांची सुरक्षा करण्यासाठी फवारणी केली. परंतु कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. कृषी अधिकार्‍यांना फोन केला. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही.

नुकसान भरपाईची मागणी

मागील वर्षी शेतकर्‍यांना बोंडअळीने उद्ध्वस्त केले. हेक्टरी एक क्विंटलही कापूस निघाला नाही. सीड्स कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणूक केली जात आहे. आम्ही जोपर्यंत घरचे बियाणे वापरत होतो. तोपर्यंत कोणतीही किड पिकांवर येत नव्हती. बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारल्या जात आहे. मागील वर्षीची व यंदाही हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. कपाशी, सोयाबीनवर मावा, तुडतुडा, पांढरी माशी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी गरज असेल तरच फवारणी करावी. शेतात चिकट पिवळे सापळे घरगूती पद्धतीने लावावे, असं आवाहन कृषी अधिकारी अनिल राठी यांनी केलं.

हेही वाचा :

जमीन खरेदी विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक, परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?

मोठी बातमी,जमीन खरेदी विक्रीआधी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक, शेतकऱ्यांची निर्णयावर नाराजी

राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते थेट ‘किसान संसद’ला, कृषी कायद्यांविरोधात एकजूट

व्हिडीओ पाहा :

Different types of insects attack on crop in Yavatmal