शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सायकल वारी, प्रशासनाच्या दरबारी, तरुण शेतकऱ्याची राज्यभर भ्रमंती

| Updated on: Nov 20, 2021 | 6:05 PM

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एक तरुण शेतकरी राज्यभर सायकवर भ्रमंती करीत आहे. आत्महत्यांचे मूळ कारण शोधून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तो निवेदनही देत आहे. आतापर्यंत 1800 किमी प्रवास करुन त्याने 16 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सायकल वारी, प्रशासनाच्या दरबारी, तरुण शेतकऱ्याची राज्यभर भ्रमंती
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बाळासाहेब कोळसे तरुण शेतकरी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देत सायकलवर प्रवास करीत आहे.
Follow us on

बुलडाणा : निसर्गाचा लहरीपणा, शासनाची धोरणे आणि बेभरवश्याची शेती या सबंध प्रतिकूल परस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा या विवंचनेतून राज्यात (Farmer Suicide) शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. एकीकडे उत्पादनात वाढ झाली असल्याचे सांगितले जात असले तरी वास्तव मात्र, वेगळे असून शेतकरी आपले जीवन संपवत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एक तरुण शेतकरी राज्यभर सायकवर भ्रमंती करीत आहे. आत्महत्यांचे मूळ कारण शोधून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे यासाठी प्रत्येक (Administration) जिल्हाधिकारी यांना तो निवेदनही देत आहे. आतापर्यंत 1800 किमी प्रवास करुन त्याने 16 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

नेमक्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत. प्रशासनाने यावर काय तोडगा काढून या वाढत्या आत्महत्यांवर अंकूश आणण्याचा या तरुणाचा प्रयत्न आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आडगाव येथील बाळासाहेब कोळसे हा शेतकरी असून त्याने हा अनोखा प्रयत्न सुरु केला आहे. आतापर्यंत या शेतकऱ्याने 1800 किमी प्रवास करुन 16 जिल्ह्यातील जिल्हाधिकरी यांना निवेदन दिलेले आहे. तेही सायकलवर प्रवास करुन.

काय आहे कोळसे यांचा उद्देश?

बाळासाहेब कोळसे हे अहमदनगर जिल्ह्यातील आडगाव येथील रहिवासी आहेत. ते एक शेतकरी असून शेती व्यवसायातील अधिकचे कष्ट आणि घटते उत्पादन हे त्यांनी अनुभवले आहे. शेती व्यवसायात उत्पादन मिळाले तरी योग्य भाव मिळत नाही. परीश्रम करुनही सर्वकाही बेभरवश्याचे आहे. या सर्व परस्थितीमुळे व्यथीत होऊन त्यांनी हा प्रवास सुरु केला आहे. शेती व्यवसयात अनेक संधी असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात स्थिती ही वेगळी असून बांधावरुन शेती करणे वेगळे आणि प्रत्यक्ष कष्ट करणे हे वेगळे आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या का करतो? हे शोधण्यासाठी तो आता प्रशासनाला जाब विचारत आहे.

16 जिल्ह्यांमध्ये 1800 किलोमीटरचा प्रवास

बाळासाहेब कोळसे यांनी आतापर्यंत 16 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास हा 1800 किलोमीटरचा झालेला आहे. उर्वरीत 20 जिल्ह्यांमध्येही ते जाणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन ते निवेदन देणार आहे. ऐवढेच नाही शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आझाद मैदान येथे उपोषणास बसणार आहेत.

काय आहेत मागण्या ?

बाळासाहेब कोळसे यांना शेती व्यवसाय करताना ज्या अडचणी आल्या आहेत त्याच समस्यांवर तोडगा काढला तर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल असे त्यांचे म्हणने आहे. प्रशासनाला देण्यात येत असलेल्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांनाच त्यांच्या शेतीमालाची किमंत ठरवता यावी, शासनाकडून देण्यात य़ेणारी एकरी मदत ही उत्पादनावर झालेला खर्च पकडून देण्यात यावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, कर्जमुक्ती ही सर्वच शेतकऱ्यांची केली जावी अशी मागणीही त्यांनी निवेदनात केलेली आहे. कोळसे यांनी अहमदनगरहून सायकलहून प्रवासाला सुरवात केली असून दोन दिवसापूर्वी ते बुलडाणा येथे आले होते. त्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप, कशामुळे होत आहे दिरंगाई?

कमी खर्चात अधिकचे उत्पादन, ढोबळी मिरची लागवडीची योग्य पध्दत कोणती?

थकबाकीदारांना माफी, कर्ज परतफेड करणाऱ्यांचे काय ? शरद पवारांचा राज्य सरकारला मोलाचा सल्ला