कधी ढगफुटी, कधी दुष्काळ, शेतीचं मोठं नुकसान टाळण्यासाठी पठ्ठ्याने स्वत:च शेतात हवामान केंद्र उभारलं!

| Updated on: Sep 30, 2021 | 1:10 PM

सांगली जिल्ह्यातील जत येथील एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये हवामान केंद्राची उभारणी केली आहे. यामुळे ऊन, वारा, पावसाचे अंदाज घेऊन शेतीची नियोजन प्रगतीशील युवा शेतकरी सचिन संख करत आहेत.

कधी ढगफुटी, कधी दुष्काळ, शेतीचं मोठं नुकसान टाळण्यासाठी पठ्ठ्याने स्वत:च शेतात हवामान केंद्र उभारलं!
युवा शेतकरी सचिन संख
Follow us on

सांगली : हवामानातील सतत होणारे बदल समजणे दिवसेंदिवस महत्त्वाचे ठरु लागले आहे. या गरजेतूनच सांगली जिल्ह्यातील जत येथील एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये हवामान केंद्राची उभारणी केली आहे. यामुळे ऊन, वारा, पावसाचे अंदाज घेऊन शेतीची नियोजन प्रगतीशील युवा शेतकरी सचिन संख करत आहेत. शिवाय या केंद्राचा आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे.

भारतीय शेती हवामानावर अवलंबून

भारतीय शेती ही हवामानावर अवलंबून असल्यामुळे ती सतत अस्थिर मानली जाते. बदलते हवामान यामुळे शेतीवर नेहमीच संकट असते. त्यामुळे हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना काळाची गरज बनला आहे. या गरजेतून सांगली जिल्ह्यातील जत येथील प्रगतशील शेतकरी सचिन संख यांनी आपला शेतात स्वतःचे हवामान केंद्र उभारले आहे.

उच्चशिक्षित बागायतदाराकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

जत हा तसा अवर्षणग्रस्त भाग. सततच्या दुष्काळी स्थितीला तोंड देत शेती करायची आणि लहरी पावसामुळे हातातोंडाला आलेले पीक हातचे जायचे हे नेहमीचेच. बेभरवशाच्या नैसर्गिक वातावरणात शेती व्यवसायाला स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी संगणक अभियंता असलेल्या सचिन संख यांनी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. संख यांची सुमारे 45 एकर शेती आहे, ज्यामध्ये ते द्राक्ष आणि डाळींबाचे उत्पादन घेतात.

कधी ढगफुटी, कधी दुष्काळ, मात्र आता…

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून 55 हजार रुपयांमध्ये उभ्या राहिलेल्या या यंत्रणेद्वारे त्यांना आता शेत परिसरातील तापमान, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील आद्रता, द्राक्ष वेलींच्या पानांवर पडणारे दव, पानातून होत असलेले बाष्फीभवन, पर्जन्यमान याची अचूक माहिती मिळू लागली आहे.

त्यामुळे पिकाच्या वाढीपासून ते काढणीपर्यंतचे नेमके नियोजन करणे शक्य झाले आहे. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे अधिकचे नुकसान सचिन संख यांना आता टाळता येत आहे. याशिवाय या हवामानाच्या अंदाजाचा फायदा 3 ते 4 किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना देखील होत आहे.

गावा-गावात हवामान केंद्र उभारण्याची गरज

तंतोतंत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी गावा-गावात हवामान केंद्र उभारण्याची आवश्यकता असून केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत सचिन संख यांनी केले आहे.

(farmer from maharashtra Sangli set up a meteorological station in his field)

हे ही वाचा :

72 तासानंतरही पिक पाण्यात, कसा करणार नुकसानीचा दावा ? काय आहे पर्याय

जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकारचे हजारोंचे अनुदान, असा करा अर्ज

दुध डेअरीच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला मिळणार काम अन् दुध उत्पादकांना प्रोहत्साहन