अतिवृष्टीच देणं ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत वाढ, रब्बी हंगामाला पोषक वातावरण

| Updated on: Nov 13, 2021 | 10:43 AM

अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे. एवढेच नाही तर भूजल पातळीत वाढ झाली असून याचा रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मराठवाड्याच्या पाणीपातळीत 2.79 मीटरने वाढ झालेली आहे.

अतिवृष्टीच देणं ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत वाढ, रब्बी हंगामाला पोषक वातावरण
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : अतिवृष्टीने (Heavy Rain) खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी (Marathwada) मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे. एवढेच नाही तर (increase in water level) भूजल पातळीत वाढ झाली असून याचा रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मराठवाड्याच्या पाणीपातळीत 2.79 मीटरने वाढ झालेली आहे. यंदाही वरुणराजाची मराठवाड्यावरच कृपादृष्टी राहिलेली आहे.

यंदा अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा परिणाम काय झाला हे आता प्रकर्षाने जाणवत आहे. पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण लातूरसारख्या आवर्षणग्रस्त भागातही जलसाठे तुडुंब भरुन वाहत आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक भूजल पातळी ही लातूर जिल्ह्यात वाढलेली आहे. तब्बल 4.37 मीटरने पाणीपातळी वाढली आहे तर सर्वात कमी हिंगोलीची 1.16 मीटरने वाढली आहे. त्यामुळे खरिपासाठी नुकसानीचा ठरलेला पाऊस आता रब्बी हंगामातील पिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

सरासरीपेक्षा दुपटीने पाऊस

मराठवाड्यात पावसाविना पिके वाया जातात असेच दरवर्षीचे चित्र असते. यंदा मात्र, परस्थिती बदलली असून अधिकच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. मराठवाड्यात पावसाची सरासरी ही 679.5 मिमी असते. यावेळी मात्र, 1112.4 मिमी पाऊस मराठवाड्यात बरसलेला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात 2.3 मीटरवर असलेली पाणीपातळी ही थेट 4.37 वर गेलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटलेलाच आहे पण प्रकल्पातील शेतीसाठी असलेले राखीव पाणी यंदा देण्याचा निर्णय झाला आहे.

रब्बी हंगामातील पिकांना फायदा

पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी मराठवाड्यातील प्रकल्प हे यंदा तुडूंब भरले होते. त्यामुळे यंदा शेतीसाठी राखीव ठेवण्यात आलेले पाणीही दिले जाणार आहे. पाणीसाठा तर मुबलक आहे. हवामान पोषक राहिले तर रब्बी हंगाम जोमात येणार आहे. यंदा उशीराने रब्बीच्या पेरण्या होत आहेत. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. शिवाय पाणीसाठा असल्याने उत्पादनातही वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

ऊसाच्या क्षेत्रामध्येही होणार वाढ

सध्या ऊसाचे गाळप सुरु आहे. ऊस तोडणी झाली की, लागलीच लागवडीला सुरवात होते. यंदा ऊसासाठी सर्वकाही पोषक असल्याने क्षेत्र वाढणार असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितलेले आहे. ऊस हे नगदी पीक आहे. त्यामुळे पडेल ते कष्ट करुन हे पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतात. शिवाय राज्यातील वातावरणही ऊसासाठी पोषक आहे. येथील ऊसामुळे राज्याच्या सरासरी साखरेचा उतारा हा 11.40 टक्के एवढा आहे. जो राष्ट्रीय उताऱ्यापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ऊसाला अधिकची मागणी आहे.

अशी झाली पाणीपातळीत वाढ

मराठवाड्यात सर्वाधिक भुजल पातळीत वाढ लातूर जिल्ह्यात झाली आहे. अतिवृष्टी आणि पावसामध्ये सातत्य यामुळे 4.37 मिमी ने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ परभणीत 3.94 मिमी, बीड 3.16 मिमी, उस्मानाबाद 3.85, नांदेड 1.21 तर सर्वात कमी हिंगोली जिल्ह्याची 1.16 मिमी ने वाढ झाली आहे. पण या भुजल पातळीच्या वाढीमुळे पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या :

महावितरणच्या ‘कुसुम योजने’चे पहिले पाऊल, प्रकल्प उभारणीसाठी टेंडर

रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘असे’ करा नियोजन..!

‘डीएपी’ कृत्रिम टंचाई, नांदेडमध्ये दोन विक्रेत्यांचे परवाने निलंबित, कृषी विभागाची कारवाई