Unseasonable Rain : आंबा हंगामाचा शेवटही अवकाळीनेच, उन्हाळी पिकांवरही अवकृपाच

| Updated on: May 05, 2022 | 9:42 AM

गेल्या महिन्याभरापासून अवकाळीने उसंत घेतली होती. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच पुन्हा अवकाळीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव, तामसा येथे बुधवारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. जवळपास अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने आंबागळ झाली.

Unseasonable Rain : आंबा हंगामाचा शेवटही अवकाळीनेच, उन्हाळी पिकांवरही अवकृपाच
अवकाळीमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
Follow us on

नांदेड : सबंध वर्षभर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम काय असतो याचा प्रत्यय प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना आला आहे. पावसामुळे खरिपातील उत्पादनात घट झाली तर सर्वाधिक नुकसान हे फळबागांचे झाले होते. आता (Mango Orchard) आंबा पिक अंतिम टप्प्यात असताना (Marathwada) मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये (Unseasonable Rain) अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा मावळल्या आहेत. यापुर्वी कडाक्याच्या उन्हामुळे आंबा बागा करपल्याच्या घटना घडल्या होत्या तर आता पावसामुळे फळगळ झाली आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे वर्षाचे नियोजन बिघडले आहे. एवढेच नाही तर आता उन्हाळी पिकांनाही याचा फटका बसला आहे. 15 दिवसांनी काढणी कामे सुरु होणार असतानाच झालेल्या पावसामुळे सोयाबीन, भुईमूगच्या उत्पादनात घट होण्याच धोका आहे.

वादळी-वाऱ्यासह पावसाची हजेरी

गेल्या महिन्याभरापासून अवकाळीने उसंत घेतली होती. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच पुन्हा अवकाळीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव, तामसा येथे बुधवारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. जवळपास अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने आंबागळ झाली. यापुर्वीच उन्हामुळे आंब्याचे नुकसान झाले होते तर आता पावसामुळे अधिकचे नुकसान झाले आहे.

उन्हाळी पीके अंतिम टप्प्यात

उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन सोयाबीन, भुईमूग, राजमा या पिकांची लागवड केली होती. संपूर्ण हंगामात पाण्याची उपलब्धता असल्याने पिकेही बहरात होती. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात अवकाळीमुळे पुन्हा उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. खरीप हंगामात ज्याप्रमाणे सोयाबीनचे नुकसान झाले तीच अवस्था आता उन्हाळी हंगामात झाली आहे. शेतकरी उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक प्रयत्न करीत आहे पण त्याला अवकाळीचा अडसर हा ठरलेलाच आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

सध्या उन्हाळी हंगामातील पिके ही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडल्यास त्याची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी साठवणूक ही गरजेची आहे. तर भुईमूगाला अद्याप वेळ असल्याने अवकाळी पावसाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही.तर दुसरीकडे या अवकाळी पावसामुळे शेती मशागतीची कामे करणे सोईस्कर होणार आहे. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे उरकून घेण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.