प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे पुरस्कार जाहीर, ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्कार सुरु होणार: दादाजी भुसे

| Updated on: Apr 01, 2021 | 7:12 PM

कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन 2018 व 2019 या दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे पुरस्कार जाहीर, ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्कार सुरु होणार: दादाजी भुसे
दादाजी भुसे
Follow us on

मुंबई: राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी अथवा संस्थेस राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.  कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन 2018 व 2019 या दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. शेती क्षेत्रातील सर्वोच्च अशा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील संजीव गणपतराव माने यांना 2018 चा तर 2019 साठी बारामती तालुक्यातील पिंपळी येथील राजेंद्र दिनकरराव पवार व नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव येथील श्रीमती सुनंदा संतोषरावजी सालोटकर (जाधव) यांना जाहीर झाल्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी केली आहे.बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री सुनिल केदार, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषि विस्तार संचालक विकास पाटील यावेळी उपस्थित होते. (Maharashtra Agriculture Department declared agriculture awards for farmers)

पुढील वर्षापासून युवा शेतकरी पुरस्कार देणार

शेती क्षेत्राशी संबधित डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडीत पुरस्कार, कृषीभूषण (सेंद्रिय शेती) व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादि पुरस्कारांने प्रगतीशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते. पुढील वर्षापासून ‘युवा शेतकरी’, कृषी शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ पुरस्कार नव्याने सुरु करण्यात आल्याचे सांगुन आता पुरस्कारांची संख्या ६३ ऐवजी 99इतकी केली असल्याचे व पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल केले असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान होणार

आर्थिक व कृषी हवामान परिस्थिती अडचणीची असून देखील काही शेतकरी आपल्यापरीने नवीन प्रयोग व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून परीसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक होईल असे काम करीत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या बाबत कृषि विभागाने स्वत: पुढाकार घेऊन संबंधित शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पुरस्काराचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावेत. या कामी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर तालुक्यातील प्रस्ताव तयार करण्याची विशेष जबाबदारी देणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

2018 मध्ये 58 शेतकऱ्यांना पुरस्कार

सन 2018 व 2019 साठीच्या पुरस्कारार्थींची नावे जाहीर करण्यात आली असून 2018 मध्ये 58 पुरस्कार आहेत. त्यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार एक, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार 10, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार एक, वसंतराव नाईक शेतीमीत्र पुरस्कार 3, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 25, उद्यानपंडीत पुरस्कार 8, कृषीभूषी (सेंद्रीय शेती) पुरस्कार 8, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार 2 अशा एकूण 58 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत.

2018 मध्ये 64 शेतकऱ्यांना पुरस्कार

सन 2019 साठी काही पुरस्कारांमध्ये पुरस्कारार्थींची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार एक ऐवजी दोन जणांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार पाच जणांना तर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार दोन ऐवजी तीन जणांना देण्याचा निर्णय झाला असून उर्वरित अन्य पुरस्कारांमध्ये पुरस्कारार्थींची संख्या समान असल्याने 2019 च्या पुरस्कारार्थींची संख्या 58 वरुन 64 झाली आहे.

संबंधित बातम्या:

आनंदाची बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार

कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचा सल्ला

(Maharashtra Agriculture Department declared agriculture awards for farmers)