गोदाम रिकामे नसल्याने मक्याला बुरशी लागण्याची शक्यता, शेतकऱ्यांनी सांगितली व्यथा
गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या नियोजन शुन्य कारभाराचा निषेध केला आहे. एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या घरात मका पडून आहे, त्याची खरेदी झाली नसल्यामुळे कीड व बुरशी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
शाहिद पठाण, गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव (arjuni morgaon) शेतकऱ्यांचे धान व मका पीक मागच्या महिन्यात निघाले आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाने (unseasonal rain) यंदा मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. जो मका चांगला होता, तो शेतकऱ्यांनी काढला आहे. मागच्या एक महिन्यापासून मका शेतकऱ्यांच्या (farmer news) घरात आहे. शासकीय आधारभूत हमीभाव केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. गोदाम रिकामे नसल्याचे कारण सांगितलं जात आहे. अनेक महिने खरेदी होऊ शकत नाही असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. कारण एक महिन्याच्या कालावधीनंतर मक्याला कीड किंवा बुरशी लागण्याची शक्यता असते.
नेमकं काय झालंय
गोदाम रिकामे नसल्याचे सांगितले जातं आहे, धान्य अनेक महिने राहू शकते. मात्र, मक्याला कीड व बुरशी लागण्याची शक्यता असते. मागच्या महिनाभरापासून मका घरात पडला आहे. पाऊस कधी येऊन मका भिजेल ते सांगता येत नाही. खरेदीसाठी होणाऱ्या या विलंबामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात धान व मका पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. धानशेती अधिक खर्चाची आहे म्हणून शेतकरी हळूहळू मका पिकाकडे वळत आहेत. मात्र, तालुक्यात यावर्षीच्या उन्हाळी हंगामात 468 हेक्टर जमिनीत मका पीक लागवड करण्यात आली आहे.
सध्याच्या वर्षीचं अंदाजे उत्पादन सुमारे ३० हजार क्विंटल अपेक्षित आहे. शासकीय आधारभूत हमीभाव केंद्रे तातडीने सुरू झाली पाहिजेत अशी शेतकरी मागणी करीत आहेत. याबाबतीत शासनाचे कोणतेही पूर्वनियोजन दिसल्याचे शेतकरी सांगत आहेत. अजूनही गोदामे धान्यांनी भरलेली आहेत. गोदामे रिकामी झाल्याशिवाय कुठल्याही धान्यांची खरेदी सुरू करता येत नाही. कारण खरेदी केलेला माल ठेवायचा प्रश्न निर्माण होतो. यात व्यापाऱ्यांचे भले होते, नुकसान मात्र शेतकऱ्यांचे होते. शेतकऱ्यांना कवडीमोल किंवा व्यापारी जो दाम म्हणेल त्या दराने उत्पादित शेतमाल विक्री करावा लागतो. शेतकऱ्यांसमोर पर्याय उरत नाही. आता शेतकऱ्यांचा मका महिनापूर्वी निघाला आहे, अशा परिस्थितीत शासकीय आधारभूत हमीभाव केंद्र सुरू व्हायला पाहिजे होती, मात्र अद्याप ते सुरू झालेली नाहीत.