विज तोडणीवरुन मनसे आक्रमक, तर अधिकाऱ्यांना झाडाला बांधूनच..!

| Updated on: Nov 27, 2021 | 3:28 PM

सबंध राज्यात कृषीपंपाच्या विजतोडणीला विरोध होत आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच आता महावितरणकडून सक्तीची वसुली अन्यथा कृषीपंपाचा विद्युत पुरवठाच खंडीत असे धोरण राबविले जात आहे. पण याला शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून विरोध होत आहे. आता ऐन हंगामात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाणार आहे.

विज तोडणीवरुन मनसे आक्रमक, तर अधिकाऱ्यांना झाडाला बांधूनच..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पंढरपूर : सबंध राज्यात कृषीपंपाच्या विजतोडणीला विरोध होत आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच आता महावितरणकडून सक्तीची वसुली अन्यथा कृषीपंपाचा विद्युत पुरवठाच खंडीत असे धोरण राबविले जात आहे. पण याला शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून विरोध होत आहे. आता ऐन हंगामात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाणार आहे. एवढेच नाही तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट झाडाला बांधले जाणार असल्याचा गर्भित इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आज पंढरपुरात दिला आहे.

वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीकडून सबंध राज्यात वसुली मोहीम सुरु आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी अदा केलेली नाही अशा कृषीपंपाचा विद्युत पुरवठाच खंडीत केला जात आहे. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होणार असल्याने ही कारवाई स्थगित करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात येत आहे.

आठ तासच विद्युत पुरवठा

रब्बी हंगामातील पिकांची उगवण झाली की भारनियमन लागू करण्यात आले आहे. यापूर्वी कृषीपंपासाठी दहा तास विद्युत पुरवठा होता. मात्र, आता विजेचा अधिकचा वापर आणि वसुली शुन्य असल्याने केवळ 8 तास पुरवठा केला जात आहे. तर रात्रीच्या वेळीच हा विज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वीच खरीप हंगामाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. आता महावितरणमुळे जर पिके धोक्यात आली तर ते सहन केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचेच पैसे महावितरणकडे

शेतामध्ये उभारण्यात आलेल्या रोहित्रांचे आणि विजेच्या खांबाचेच पैसे महावितरणकडे थकीत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हे पैसे कंपनीने शेतकऱ्यांना अदाच केलेले नाहीत. सध्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही नाजूक आहे. यातच वसुलीचा तगादा लावल्यास विजबिल अदा करायचे कसे असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने नियमांमध्ये शिथिलता आणून विद्युत पुरवठा खंडीत करु नये अशी मागणी करण्यात आली आहे.

काल निवेदन आज गर्भित इशारा

मराठवाड्यातही महावितरणची वसुली मोहिम सुरु आहे. लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात थकबाकीदारांच्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठी मध्यंतरी खंडीत करण्यात आला होता. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सक्तीची विज वसुली थांबवावी आणि विद्युत पुरवठाही खंडीत करु नये अशा मागणीचे निवेदन मनसेचे दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे, प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी विभागीय आयुक्त यांना दिले होते. तर आज पंढरपूरात विद्युत पुरवठा खंडीत केला जात असल्याचे निदर्शनास आल्याने हा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

पिक विमा कंपन्यांच वागणं बरं नव्हं..! थेट केंद्र सरकारच्या योजनेवरच परिणाम

डाळिंबापेक्षाही टोमॅटो महाग, केव्हा मिळणार दिलासा? केंद्र सरकारनेच सांगितला तोडगा

काय सांगता? एकरकमी विजबिल थकबाकी भरल्यास 50 टक्के सूट, शेतकऱ्यांना सुवर्णसंधी